आर्णी (जि. यवतमाळ) : कडाक्याच्या थंडीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. गावगाड्यातील भांडण तंटे उफाळून बाहेर येत आहेत. या निवडणुकीमुळे रक्ताचे नातेही दुरावले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका जागेसाठी एकाच कुटुंबातील तीन जावा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
आर्णी तालुक्यातही ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची निवडणूक ही चुरस निर्माण करणारी असून, गावागावात नातेसंबंधांना आव्हान ठरणारी निवडणूक आहे. भाऊ-भाऊ, काका-पुतणे, बहीण-भाऊ, दीर-भावजय, मामा-भांजे, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण मतदारांपुढे कमालीचा पेच निर्माण झाला आहे.
एकमेकांची जिरवण्याच्या मानसिकतेमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सत्तेचा हव्यास कुणाला कुणाचा वैरी करेल, याचा नेमच नाही. खरी परीक्षा पाहायची असेल, तर ग्रामपंचायतमध्ये उभे राहून बघायला हवे. सत्तेसाठी कोणीही कोणाचे नसतात. हे दाखवून देणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तालुक्यातील साकूर येथील ग्रामपंचायत निवडणूक.
येथे एकेकाळी सहा उमेदवार बिनविरोध निवडून यायचे. याच गावात एका जागेसाठी चार महिला उमेदवार समोरासमोर आहेत. त्यापैकी तीन उमेदवार एकाच घराण्यातील असून, एकमेकींच्या जावा-जावा आहेत. म्हणजे सख्खे भाऊ पक्के वैरी ही मराठी म्हण या गावातील कुटुंबाने सत्यात आणली आहे. इतरही गावांत सत्तेसाठी नातेसंबंध दुरावले जात आहेत.
मतदारांपुढे पेच
एकाच कुटुंबातील व्यक्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहत असल्याने नेमके मतदान कुणाला करायचे, असा पेच निर्माण होत आहे. विकासाचे आश्वासन प्रत्येकच उमेदवार देत असला तरी पाच वर्षांनंतर गावगाड्यातील परिस्थितीत काही फरक पडत नसल्याचे वास्तव आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.