गडचिरोली : जगात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना गडचिरोली जिल्हा मात्र अजूनही कोरोना मुक्त आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. याचे सारे श्रेय प्रशासनाला दिले पाहिजे. इथली प्रशासकीय व्यवस्था कोरोनावर डोळ्यात तेल घालून देखरेख ठेवीत आहे. त्यासाठी शेकडो नव्हे तर हजारो कर्मचारी कार्यरत आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वत्र शोधमोहीम राबविली जात असून या कामात 2 हजार 280 कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत 19 हजार 500 प्रवाशांची नोंद करण्यात आली असून या लोकांची दैनंदिन तपासणी आशा तसेच आरोग्य सेवकांकडून केली जात आहे.
जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावस्तरावर मोहीम राबवून प्रत्येक प्रवाशाचे 14 दिवस निरीक्षण नोंदविले. आतापर्यंत बाहेरून जिल्ह्यात आलेल्या 17 हजार 220 प्रवाशांचे 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण झाले आहे. यातील काही लोकांना खोकला, ताप किंवा श्वसनास त्रास झाल्याने तसेच प्रवाशांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन न केल्याने 468 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. यातील संभाव्य 113 लोकांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यातील 94 प्रवाशांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय देखरेखीखाली ठेवलेल्या 113 पैकी 78 लोकांचे कोरोना संसर्ग तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यातील 69 नमुने निगेटिव्ह तर 9 अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.
जिल्ह्याधिकारी दीपक सिंगला यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सूक्ष्म स्तरावर नियोजन करून भेटींबाबत आराखडे तयार केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. विनोद मशाखेत्री यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यातून त्यांनी गावस्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात आला. गुगल स्प्रेडशीटचा वापर करून फ्रंटलाईन वर्कर्सपर्यंत माहिती पोचविण्यात आली.
जिल्ह्यातील 48 प्राथमिक आरोग्य केंद्र, 376 उपकेंद्र, 12 ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तर एका जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच आरोग्य अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोनाबाबत आपली सेवा देत आहेत. जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी पोलिस प्रशासनाबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जिल्ह्यातील प्रत्येक संभावित रुग्णाची तपासणी करणे, क्वारंटाईन करणे, लोकांना अचूक माहिती देण्याचे काम सुरू असून प्रशासनाच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.