कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा नरखेड तालुक्‍यात दौरा

अनिल बोंडे
अनिल बोंडे

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार राज्याचे कृषीमंत्री झाल्याने व त्यांचा आज (ता. 23) दौरा असल्याने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसत आहे. यामुळे कृषीमंत्री तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नरखेड तालुक्‍यात मागील वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ घोषित शासन मोकळे झाले. पण दुष्काळग्रस्त नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही. पाण्याची पातळी खालावल्यामुळे तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीच्या बागा वाळल्या आहे. तसेच अद्याप ही पावसानेसुद्धा हजेरी न लावल्यामुळे व पाण्यासाठी आता खर्च करण्यासाठी पैसा नसल्यामुळे फळबागा वाळतच आहे. कधी नव्हे तर शेतकऱ्यांनी यावर्षी शेतात पाण्यासाठी खर्च केला, इतकेच नव्हे तर पाणी लागले नाही. पाणी टाकून बागा वाचविण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ गेले. शेतकऱ्यांच्या बागाही गेल्या व पैसाही गेला. मात्र शासन काहीच करायला तयार नाही. दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीतून तर वगळलेच, पण जी मदत अन्य पिकांसाठी जाहीर केली, ती बॅंकांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. अशात पैसा नसलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम कसा करावा? हा खरा प्रश्न आहे.

अद्याप ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
शासनाने कर्जमाफीची घोषणा करून बराच कालावधी झाला; तरी मात्र शासनाच्या योजनेत पात्र असूनही अद्याप बरेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी मिळाली नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना बॅंका कर्जसुद्धा द्यायला तयार नाही.

नरखेड तालुक्‍यातील संत्रा व मोसंबीच्या बागा बनल्या इंधन
नरखेड तालुक्‍यातील लहानपासून तर मोठ्यापर्यंत संत्रा व मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळल्या आहेत. या बागा आता फक्त इंधनाच्या कामी येत आहेत. तसेच मोठ्या कष्टाने वाढविलेल्या बागा त्यांच्या सरणाच्या कामी येत आहेत. आधी शेतकऱ्यांच्या बागेतील एखादे झाड वाळले तर त्याचे शेतकऱ्यांना चारशे ते पाचशे रुपये मिळायचे. पण आता बागा वाळण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे व तरे घ्यायला कोणी तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांना झाडे काढण्याचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. एक झाड काढण्याचा खर्च शंभर असून ते विकल्यास शेतकऱ्यांना पन्नास रुपये मिळत आहे. अशात झाडे काढण्यासाठी शेतकऱ्यांना जवळूनच खर्च करावा लागत आहे.

चारापाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन सोडले जंगलात
नरखेड तालुक्‍यात एकीकडे माणसाला प्यायला पाणी मिळत नसल्याने गुरांना पिण्याचा प्रश्न आहे. एकीकडे शेतात पाणी नसल्यामुळे वैरण तयार केले नाही. तसेच सोयाबीनवर रोटावेटर चालविल्यामुळे व हरभरा आणि गव्हाचे उत्पादन पाण्याभावी घेता न आल्यामुळे कुटारही शेतकऱ्यांजवळ राहिले नाही. पशुधनाकरिता चारा व पाणी शेतकऱ्यांजवळ नसल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे पशुधन विकले. जामगाव (खुर्द) चे शेतकरी चंदू पेडे यांनी व त्यांच्या गावातील अनेक तसेच परिसरातील शेतकऱ्यांनीदेखील त्यांचे पशुधन जंगलात सोडल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com