अकोला : यंदाच्या हंगामातील उत्पादीत हरभरा किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी १४ मार्चपासून राज्यात प्रक्रीया सुरु करण्यात आली होती. ही खरेदी ११ जूनपासून बंद झाली असून, राज्यात ७७ लाख ३६ हजार ५०१ क्विंटल हरभरा खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे.
राज्याला यंदा ८१ लाख क्विंटल खरेदीचे उद्दीष्ट दिले होते. मात्र, शासकीय यंत्रणांमधील नियोजनातील दिरंगाईमुळे खरेदीच्या या उद्दीष्टापासून राज्य दूर राहल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडे हरभरा असूनही वेळेअभावी तो खरेदी होऊ शकलेला नाही.
किमान आधारभूत (५३३५) किमतीने यंदाच्या हंगामात १४ जूनपासून हरभरा खरेदी सुरु झाली होती. विदर्भ मार्केटींग फेडरेशन, मार्कफेड, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको, महाकिसान व्ही, महाकिसान संघ, महास्वराज्य अशा राज्य एजन्सीमार्फत ६१० केंद्रावर ही खरेदी प्रक्रीया राबवण्यात आली. या हंगामात उत्पादकतेवर आधारीत लक्षांत जिल्ह्या-जिल्ह्यांना विभागून देण्यात आला होता.
याचा फटका हरभरा उत्पादक असलेल्या काही प्रमुख जिल्ह्यांना जास्त प्रमाणात बसला. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, अशा काही जिल्हयात रब्बीत हरभऱ्याचे प्रमुख पीक घेतले जाते. लागवड क्षेत्र जास्त राहत असल्याने खरेदीवर निर्बंध नसण्याची गरज होती. परंतु खरेदी प्रक्रीया सुरु करतानाच ही मर्यादा नेमून देण्यात आल्याने स्थानिक यंत्रणांचीही गोची झाली.
अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांचे लक्ष्य तर एप्रिलमध्येच पुर्ण झाले. बुलडाणा जिल्हयात १५ ते २० दिवस नवीन लक्ष्यांक नेमून देण्यासाठी यंत्रणेने घेतला. दरम्यान, खरेदी ठप्प होती. वाढीव उद्दीष्टाच्या निर्णयानंतर खरेदी सुरु झाली. परिणामी ऐन खरेदीच्या काळातील महत्वाचे दिवस वाया गेले. इतर जिल्हयांतही अशा विलंबाचा फटका बसला.
खरेदीला जेमतेम तीन-चार दिवस शिल्लक असताना खरेदी मर्यादा उठवण्यात आली. वास्तविक ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अधिक नोंदणी केली, जेथे क्षेत्र जास्त असल्याने उत्पादन अधिक झालेले आहे, अशा जिल्हयांबाबत सुरुवातीपासून वेगळ्या धोरणाची गरज होती. परंतु सर्व जिल्हयांना एकसमान सूत्रात बांधल्याने फटका बसला.
बाजारात हरभऱ्याचा दर यंदा कधीच किमान आधारभूत किमतीपर्यंत पोचला नाही. अवघा चार हजार ते ४५०० रुपयांदरम्यान हरभरा विकत होता. अशा स्थितीत शेतकरी नुकसान भरून निघण्याच्या उद्देशाने शासकीय खरेदीच्या प्रतिक्षेत होते. एसएमएस आलेल्यांनी माल विक्रीसाठी नेला.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यात हरभरा विक्रीसाठी यंदा ५ लाख ८१ हजार ७९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख ९२ हजार ७६८ शेतकऱ्यांचा ७७ लाख ३६हजार ५०१ क्विंटल हरभरा खरेदी झाला. सुमारे एक लाख ९० हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही. यापैकी अनेकांनी शासकीय खरेदीत होत असलेली दिरंगाई पाहून खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विक्री केला.
काहींना उशिराने एसएमएस मिळाले, तोपर्यंत त्यांचा हरभरा विकून झाला होता. राज्याला ८१ लाख क्विंटलचे लक्ष्य मिळालेले असल्याने आणखी तीन ते साडेतीन लाख क्विंटल हरभरा खरेदी होऊ शकला असता.
खरेदीची आकडेवारी
एकूण खरेदी- ७७ लाख ३६हजार ५०१ क्विंटल
शेतकरी संख्या - तीन लाख ९२ हजार ७६८
एकूण नोंदणी- ५ लाख ८२ हजार ८३३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.