प्रेरणादायक : अहेरी नगरपंचायत कर्मचारीच झाले सफाई कामगार; शहराची केली स्वच्छता

अहेरी : शहराची स्वच्छता करताना नगरपंचायतीचे कर्मचारी.
अहेरी : शहराची स्वच्छता करताना नगरपंचायतीचे कर्मचारी.

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरीतील सफाई कामगारांनी कामगार कपात विरोधात तसेच वाढीव वेतनासाठी कामबंद आंदोलन पुकारल्याने राजनगरी अशी ओळख असलेल्या अहेरी शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पण, केंद्र सरकार ज्याप्रमाणे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात टोलवाटोलवी करत आहे तसाच काहीसा प्रकार येथील नगरपंचायत प्रशासनाने सुरू केला असून कामगार कामावर येत नसल्याने आता चक्‍क कर्मचाऱ्यांनाच सफाई कामगारांप्रमाणे शहर स्वच्छतेच्या कामाला जुंपले आहे.

१७ डिसेंबर २०२० पासून सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने राजनगरीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अहेरी नगरपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापनाबद्दल नागरिकांत बऱ्याच दिवसांपासून सारखी ओरड सुरू असून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शिवाय कंत्राटदाराविरुद्ध यापूर्वी अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या व चौकशीची मागणी केली गेली होती. सर्वत्र असा असंतोष असूनही नगरपंचायत प्रशासनाने थातुरमातुर चौकशी करून देयके पास केली.

जुन्याच कंत्राटदाराला दिले पुन्हा कंत्राट

एवढेच नव्हे तर त्याच कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट कसे मिळेल, यासाठी सोय करून देण्यात आली. कंत्राटदार तोच मात्र नोंदणीकृत संस्था वेगळी, असे नव्या बाटलीत जुनीच दारू, हा हातखंडा वापरण्यात आला. सर्वसामान्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपंचायत प्रशासनाने हेकेखोर निर्णय घेतल्याची टीका सर्वत्र होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाबद्दल झालेल्या तक्रारींना आजवर केराची टोपलीच दाखविण्यात आल्याने शेवटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

तोडगा काढण्याचे प्रयत्न नाही

प्रशासनाने यावर तोडगा काढण्याचे फारसे प्रयत्नदेखील केले नाहीत. उलट आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनाच मंगळवार (ता. २२) ‘स्वच्छता अभियान’ हे गोंडस नाव देऊन चक्क सफाई कर्मचारी बनवून टाकले. नुकत्याच पार पडलेल्या महात्मा गांधी जयंती, संत गाडगेबाबा पुण्यतिथी अशा दिनांना नगरपंचायत प्रशासनाला स्वच्छता अभियान आठवले नाही काय, आजच्या दिनी भारतात कुठेही स्वच्छता अभियान राबवीत नसताना प्रशासन कशाचे औचित्य साधून अभियान राबवीत आहे, असे प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे आजच्या अभियानात केवळ नगरपंचायत कर्मचारी सहभागी होते. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही शासकीय विभाग अथवा गैरशासकीय सामाजिक संस्थांचा सहभाग दिसला नाही. त्यामुळे अभियानाचा कुणालाही अभिमान न वाटता सर्वत्र हसेच होत असल्याचे दिसून येत आहे.


नववर्षांतील नियोजन
येत्या नववर्षातील नियोजनाचा भाग म्हणून आजचे अभियान राबविण्यात आले. हे अभियान नगरपंचायत प्रशासनापुरतेच मर्यादित स्वरूपात राबविण्यात आल्याने केवळ आमचेच कर्मचारी दिसले.
- अजय साळवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, अहेरी.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com