नागरिकांनो सावधान! वैनगंगा फुगणार..गोसेखुर्द धरणाचे तब्बल 29 दारं उघडले.. पाण्याचा होतोय प्रचंड विसर्ग  

Alert in Bhandara district as 29 Doors of Gosekhurda dam are opened
Alert in Bhandara district as 29 Doors of Gosekhurda dam are opened

भंडारा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून साधारण पाऊस सुरू आहे. मात्र, रविवारपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यात साकोली तालुक्‍यातील एकोडी येथे सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. 18 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील वाहतुकीवर होत आहे. या पावसामुळे अडलेली रोवणीची कामे पूर्ण होण्याची आशा आहे. मात्र, वैनगंगा व इतर नद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील शेतातील पिके पाण्याखाली येण्याची भीती निर्माण झाली आहे.

रविवारी दुपारनंतर साकोली तुमसर मार्गावरील चांदोरी येथील नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साकोली तालुक्‍यात चुलबंद नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काठावरील शेतात पुराचे पाणी शिरल्याने पीक पाण्याखाली येत आहे. लाखनी व लाखांदूर तालुक्‍यातही चुलबंद नदीला पूर आला आहे. साकोली येथील अनेक वसाहतीच्या सभोवताल पावसाचे पाणी साचले आहे. खोलगट भागातील घरांतही पाणी शिरल्याने संबंधितांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. मोहाडी व तुमसर तालुक्‍यातही जोरदार पाऊस झाला आहे.

रोवण्या पूर्ण होणार

गेल्या महिन्यात सरासरीपेक्षा फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना रोवणीची कामे पूर्ण करण्यास अडचण निर्माण झाली होती. काही ठिकाणी शेताला भेगा पडल्याने नर्सरीला रोपे सुकत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उर्वरित रोवणीची कामे लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, नदीनाल्यांना पूर आल्याने काठावरील शेतातील पिके पाण्याखाली येण्याची भीती निर्माण झाली आहे.

वैनगंगा फुगणार

मध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे संजय सरोवर धरणाचे पाणी सोडण्यात आले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वैनगंगेतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील नाले व लहान नद्यांना पूर आला आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाचे 29 दारे अर्धा मीटर उघडण्यात आली आहेत. या धरणातून 3211 क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्‍यात वैनगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात आज, सोमवारीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यामुळे पूर परिस्थितीत वाढ होण्याची शक्‍यता असून, प्रशासनाने नदीकाठावरील गावातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com