फुलसावंगी (जि. यवतमाळ): जवळपास 25 वर्षांपूर्वी अमडापूर लघु प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतीचे मालक आता शेतमजूर झाले आहेत. अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना फुलसावंगी येथे घडली.
विजय सखरू जाधव(वय ५०), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे राहते घर आणि दोन एकर शेती अमडापूर प्रकल्पात गेली. त्यानंतर त्यांचे भिकूनगर तांडा येथे पुनर्वसन करण्यात आले. विजय हे गुरुवारी (ता.22) लाकडे आणण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळपर्यत घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. तरीही त्यांचा शोध लागला नाही. शुक्रवारी (ता.23) सकाळी तांड्यालगतच्या शेतात शोध घेतला असता त्या ठिकाणी विजय जाधव झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती जाधव यांचे भाचे विकास आडे यांनी महागाव पोलिसांना दिली. लघु प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या उर्वरित मोबदल्याच्या काळजीनेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. महागाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
परसोडी बुद्रूक येथील शेतकऱ्याची आत्महत्या -
कळंब (जि.यवतमाळ): तालुक्यातील परसोडी (बुद्रूक)येथील शेतकरी रविकांत साहेबराव जगताप (वय 40 वर्षे) यांनी शुक्रवारी (ता. 23) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घरात कोणीही नसताना विष पिऊन आत्महत्या केली. बँकेचे थकलेले कर्ज व परतीच्या पावसामुळे सात एकरांतील पिकांचे झालेले नुकसान पाहून ते अस्वस्थ राहत होते. त्यांची मुले देवळी (जि. वर्धा) येथे शिक्षणासाठी असून त्यांचा खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील, असा परिवार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.