नागपूरच्या सरदारसोबत होता अमिताभ यांचा "याराना'!

File photo
File photo


नागपूर : अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पाऊल टाकले होते. दोन चित्रपट नावावर होते, पण यशाची "मंजिल' अद्याप गवसली नव्हती. अशा काळात एका चित्रीकरणासाठी ते नागपुरात आले होते. आज "झुंड'च्या निमित्ताने नागपुरात असताना त्यांना हॉटेलच्या खिडकीतून बाहेर डोकावणेसुद्धा अवघड ठरावे. मात्र, त्यावेळी मोहनसिंह अरोरा या सरदार मित्राने त्यांना सीताबर्डीची पायी सफर घडवली होती. हा "याराना' पुढे काही वर्षे कायम राहिला. पण, पुढे अमिताभ यांच्या कारकिर्दीचा "अजुबा' या मैत्रीचा "सिलसिला' टिकवू शकला नाही.
नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात आहेत. त्यांच्या नागपूरशी जुळलेल्या एका अविस्मरणीय दिवसाच्या आठवणींना मोहनसिंह यांनी उजाळा दिला. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले मोहनसिंह यांनी "सकाळ'शी बोलताना प्रत्येक क्षण जिवंत केला. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 1970च्या काळात "परवाना' चित्रपटाचे शूटिंग नागपुरात ठरले होते. दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्यासोबत अमिताभ नागपुरात दाखल झाले. सारेच कलावंत श्‍याम हॉटेलमध्ये थांबले होते. काही दिवस चित्रीकरणासाठी चांगल्या स्थळांच्या शोधात पूर्ण युनिट होते. नंतर मात्र निराश होऊन निघून गेले. पण, अमिताभ एक दिवस उशिरा गेले. ज्योती स्वरूप यांनी अमिताभ यांना कंपनी देण्याची जबाबदारी तेव्हाचे चित्रपट वितरण क्षेत्रातील "डॉन' मोहनसिंह अरोरा यांच्यावर सोपवली. मोहनसिंहने अमिताभ यांना जयश्री टॉकीजमध्ये "गोपी' चित्रपटाच्या मॅटनी शोमध्ये गुंतवून ठेवले आणि तेवढ्या वेळात कामे आटोपली. त्यानंतर मोहनसिंहने अमिताभ यांना आनंद टॉकीज, वसंत टॉकीज (आत्ताची लक्ष्मी टॉकीज) या मार्गाने सीताबर्डीच्या बोळींमधून बराच वेळ पायी फिरवले. तेव्हा "सुपरस्टार' हे बिरूद लागायचे असल्याने अमिताभ यांनीही "मै आझाद हूँ' म्हणत सफर केली. शेर-ए-पंजाबमध्ये एक पत्रकार परिषद झाली. त्यानंतर ते लगेच मुंबईला निघणार होते; पण नागपूरच्या सुदैवाने काही कारणाने त्या दिवशीची विमानं रद्द झाली. सायंकाळी मुंबईत "आनंद'चे शूटिंग होते. तिथे पोहोचणेही त्यांना शक्‍य नव्हते. त्याच रात्री मोहनसिंह यांनी दादर एक्‍स्प्रेसचे (आत्ताची सेवाग्राम एक्‍स्प्रेस) तिकीट काढून दिले. तोच "आखरी रास्ता' उरला होता. दोघेही रात्री स्टेशनवर पोचले तेव्हा गाडी "हाउसफुल्ल' होती. "हम जहां खडे होते है वहीसे लाईन शुरू होती है' हा अमिताभचा "डायलॉगही' तेव्हा चित्रपटात आला नव्हता. शेवटी मोहनसिंह यांनी टीसीला "खास विनंती' करून अमिताभ यांना जागा मिळवून दिली. पुढे अमिताभ यांची घोडदौड साऱ्या जगाला माहिती आहे..."खुदा गवाह' आहे!
50 साल हो गए। मुझे सब याद है, शायद उन्हें भी होगा। उसके बाद हमारी दो तीन मुलाकाते हुई थी। यदि पहली मुलाकात में फ्लाईट कैंसल ना होती, तो शायद ये यादे भी नहीं होती।
मोहनसिंह अरोरा, ज्येष्ठ चित्रपट वितरक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com