
अमरावती : निर्दोष व्यक्ती अडकायला नकोत ; नवनीत राणा
परतवाडा : शहरात शांतता राहावी हे सर्वांचे कर्तव्य आहे. या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची योग्य तपासणी व्हावी. विनाकारण निर्दोष व्यक्ती अडकायला नकोत. खऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
अचलपूर शहरात झेंडा लावण्याच्या कारणावरून रविवारी वाद झाला. त्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने संचारबंदी लावण्यात आली आहे. पोलिसांनी धरपकड सुरू करून २७ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. आज सकाळी व सायंकाळी संचारबंदीत सात तास शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला.दरम्यान, जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी आज सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचलपूर पोलिस ठाण्याला भेट देत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवगिरे, तहसीलदार मदन जाधव, अचलपूरचे ठाणेदार माधवराव गरुड, परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे आदी उपस्थित होते.
डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध बुधवारी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार नोंदविली होती. समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. अचलपुरात उद्भवलेल्या परिस्थितीला पालकमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. बोंडे यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Amravati Achalpur City Flag Hoisting Dispute Arose Curfew Imposed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..