भयंकर! पालकांनी मोबाईल कुठून आणला असं विचारलं म्हणून अल्पवयीन मुलीने घरच्यांच्या जेवणात कालवले विष

Attempt to poison minor girl's family
Attempt to poison minor girl's family

लाखनी (जि. भंडारा) : अलीकडे आई-वडिलांना मुलांना काही म्हणण्याचीही सोय उरलेली नाही. रागाच्या भरात ते कुठले पाऊल उचलतील याचा नेम नाही. असाच प्रत्यय लाखनी-सावरी येथे घडलेल्या घटनेवरून आला. तुझ्याकडे मोबाईल कुठून आला अशी विचारणा आई-वडिलांनी केली असता अल्पवयीन मुलीने चक्क घरचांच्या जेवणात विष कालवले. या अन्नातून विषबाधा झाल्याने जुळ्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी सायकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. 

अल्पवयीन मुलगी शहरातील शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने शाळेला सुट्या आहेत. बाहेर जाणे-येणेही बंद आहे. अशातच पालकांना तिच्याजवळ मोबाईल दिसला. मोबाईल कुठून आणला? व कोणी दिला? याविषयी पालकांनी मुलीला विचारणा केली. परंतु, आई-वडिलांच्या प्रश्‍नांचे समाधानकारक उत्तर मुलीला देता आले नाही. यामुळे आई-वडिलांनी तिला चांगलेच रांगावले.

आई-वडिलांनी रागावल्याच्या मुलीच्या मनात राग होता. सायंकाळी घरची सर्व मंडळी छतावर फिरत असताना मुलीने स्वयंपाकखोलीत जाऊन जेवणाच्या भांड्यात विष मिसळवले. नेहमीप्रमाणे घरची सर्व मंडळी जेवणासाठी खाली उतरले. यावेळी खोलीत त्यांना विषारी पदार्थाचा उग्र दर्प आला. परंतु, भूक लागली असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यावेळी मुलीच्या जुळ्या बहिणीने जेवायला सुरुवात केली. यानंतर तिला मळमळ व उलटीचा त्रास जाणवल्याने वडिलांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. 

मुलीला अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. मुलीवर आता भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी संगितले. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर व पोलिस शिपाई मुकेश गायधणे करीत आहेत.

मुलीने केला गुन्हा कबूल

घरची मंडळी नेहमीप्रमाणे सायंकाळी छतावर फिरत होती. यापूर्वीच त्यांनी स्वयंपाक तयार केला होता. आई-वडिलांनी रागावल्याचा राग अल्पवयीनच्या मनात होता. तिने रागाच्या भारात स्वयंपाक खोलीत जाऊन अन्नात विष मिसळवले. तिच्या जुळ्या बहिणीने हे अन्न खाल्याने तिला विषबाधा झाली. अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलीने गुल्हा कबूल केला. 

पालकांची काय चूक?

मुलीची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. वडील मजुरी करून प्रपंच चालवितात. आपल्या मुलांच्या हालचालीकडे व वागणुकीकडे लक्ष ठेवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. तेव्हा शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीकडे मोबाईल कुठून आला? अशी विचारणा करणे स्वाभाविक आहे. परंतु, मुलीने रागाच्या भरात अविचार केला. सध्या लॉकडाउनच्या काळात मित्र व मैत्रिणींशी भेटीगाठी होत नसल्याने शालेय विद्यार्थी व अल्पवयीनांची घुसमट होत आहे. सुखवस्तू घरातील मुले मोबाईलवर चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग करतात. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, ते चुकीच्या मार्गाने जात असल्याचे दिसून येते. मात्र, या घटनेतून पालकांची काय चूक, असाच प्रश्‍न उपस्थित होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com