
विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी बिरुदावली मिळवून संत्रा शेतीची महती सांगणाऱ्या या परिसरात नगदी पीक म्हणून हिरव्या मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकरी वळू लागला. हळूहळू ही व्याप्ती जिल्ह्यालगतच्या दुसऱ्या जिल्ह्यातही गेली व हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. राजुराबाजार हे परिसरातील हिरवी मिरची खरेदीचे मोठे केंद्र बनले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिरवी मिरची मार्केटमध्ये हिरव्या मिरचीचा सायंकाळी बाजार सुरू झाला. गेल्या दहा वर्षांपासून याठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली हिरवी मिरची खरेदी करून ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली जाते.
आजही हजारो हेक्टरवर हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली. 478 हेक्टरवर मिरचीची लागवड होईल, असा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला होता. सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळाला, मात्र ऐन भरात असताना मिरचीचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांवर मिरची उपटून फेकण्याची वेळ आली. यावर्षी मात्र मागील अनुभव पाहता मिरचीची लागवड कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालुका कृषी नियोजनातसुद्धा मागील वर्षीपेक्षा हेक्टरी घट दिसून येत असून नियोजनानुसार तालुक्यातील मिरचीची लागवड 163 हेक्टरवर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय कोरोनाच्या लॉकडाउन व संचारबंदीमुळे मिरची बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मिरचीची रोपे तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. रोपच तयार नसल्याने रोपांची कमतरता निर्माण होईल व पर्यायाने लागवड कमी होईल. परिणामी उत्पादनात घट येईल, असा अंदाज आहे. शिवाय कोरोनामुळे मिरची वाहतुकीसोबत ग्राहकांच्या घरापर्यंतचा प्रवास कसा करणार याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात साशंकता असल्याने हिरव्या मिरचीचा ठेचा अधिकच तिखट होईल, असे भाकीत वर्तविल्या जात आहे.
मागील वर्षी 2019-20 मध्ये राजुराबाजार येथील बाजारात 37279.21 क्विंटल मिरचीची आवक झाली. एकूण 5 कोटी 1 लाख 43 हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. बाजारभाव 600 ते 2200 रुपयांपर्यंत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा मिळाला. मात्र यंदा लॉकडाउनमुळे मिरचीची खरेदी होईल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे.
दिल्ली, कानपूर, गोरखपूर, कलकत्ता, मुंबई अशा मोठ्या शहरांत येथील मिरची पाठविली जाते. या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे, आष्टी, आर्वी तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आदी ठिकाणांवरून शेतकरी आपली मिरची विक्रिसाठी आणतात. हा बाजार रात्रकालीन असून संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो व रात्रभर चालतो, हे विशेष.
गेल्या दहा वर्षांपासून मी मिरचीचे पीक घेत होतो. मागील वर्षी उत्पादन खर्च जास्त आला त्यामानाने भाजारभाव मिळाले नाही. शिवाय आता खते व कीटकनाशकांचे भाव वाढलेले आहेत. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची वाहतूक होणार की नाही, ही भीती आहे. त्यामुळे मी यावर्षी मिरचीची लागवड केलेली नाही.
-सागर भोंडे, मिरची उत्पादक शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.