
वर्धा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे म्हणत जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. साधारणत: जानेवारी महिन्याच्या मध्यात या स्पर्धा होतात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे यंदा फेब्रुवारी मध्यात येत असताना या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा मुहूर्तच जुळून येत नसल्याचे दिसते.
मार्च महिना साधारण: परीक्षेचा म्हणून ओळखला जातो. शिवाय फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. त्यानंतर काही दिवसांतच शाळांच्या वार्षिक परीक्षा होणार आहेत. अशात विद्यार्थ्यांनी या परीक्षांची तयारी करावी की या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेची, अशी पंचाईत निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. यामुळे त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारीही शिक्षकांवर असते.
सध्या जिल्हा परिषदेचे शिक्षक निष्ठा प्रशिक्षणात व्यस्त आहेत. यानंतर होणारी शिष्यवृत्तीची परीक्षा आणि महाशिवरात्री या सर्व प्रकारांमुळे अद्यापही या स्पर्धांच्या आयोजनाची तारीख ठरलेली नाही. या महिन्याच्या शेवटात या स्पर्धा होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
यातच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीची परीक्षा आहे. या परीक्षेच्या काळात या स्पर्धांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाचे शैक्षणिक सत्र संपण्याचा काळ आला असताना जिल्हा परिषदेच्या शाळांच्या या स्पर्धा अद्याप पार पडल्या नाहीत. नसलेल्या वेळा, परीक्षांचा काळ, शिक्षकांचे प्रशिक्षण यामुळे या स्पर्धा होतात अथवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ विभागाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांत नसलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धांपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांकरिता जिल्हा परिषदेकडून मागील वर्षी 12 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. यंदा या अनुदानात कपात करण्यात आली आहे. या स्पर्धांकरिता जिल्हा परिषदेकडून केवळ सात लाख रुपये देण्यात येणार आहे. एवढ्या पैशात या स्पर्धा कशा पार पडतील याचा विचार पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते. पण, तसे होताना दिसत नाही.
शासनाच्या वतीने शिक्षकांना विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यातही शिक्षक प्रशिक्षणावर होते. आता पुन्हा निष्ठा प्रशिक्षण सुरू आहे. यामुळे या स्पर्धा केव्हा घ्याव्या असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक विकासाला खो दिल्या जात असल्याचे आरोप काही शिक्षकांकडून होत आहे. यावर वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
यंदाच्या सत्रात पावसाळा जरा लांबला. केव्हाही पाऊस येण्याची शक्यता असल्याने नियोजन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला. शिवाय जिल्हा क्रीडा संकुलाची तारीख मिळाली नाही. तारीख मिळाली तर शिक्षक प्रशिक्षणावर असल्याचे दिसून आले. यामुळे या स्पर्धा लांबणीवर पडत आहेत. या महिन्याच्या शेवटात या स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न आहे.
- उल्हास नरड
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वर्धा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.