भाव नसल्याने हळदीचा रंग पडला फिका; शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेना

The color Turmeric low due to lack of price; Farmers did not get income
The color Turmeric low due to lack of price; Farmers did not get income

शेंदुरजनाघाट (जि. अमरावती) : हळद लागवडीत खर्च निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे आता पाठ फिरविली आहे. परिणामी लागवडीचे क्षेत्र सुद्धा घटले आहे. त्यामुळेच अतिशय प्रसिद्ध असलेल्या शेंदुरजनाघाट येथील हळदीचा रंग सुद्धा फिका पडू लागला आहे. शेंदुरजनाघाट येथे हळदीचे पीक खोदण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. सोबतच खोदलेले हळकुंड उकळून ते वाळविणे व वाळवून विक्रीसाठी तयार करणे सुरू आहे. या गावात हळद लागवड करणारे पिढीजात शेतकरी असून ते हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत होते. परंतु, जागेचा अभाव असून बाजारपेठसुद्धा उपलब्ध नाही. त्यातच हळद तयार करण्यासाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघत नसल्याने हळदीचे लागवडक्षेत्र कमी झाले आहे.
 
हळदीचे पीक घेणारे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून मृगाच्या पावसाची वाट पाहत असतात. पाऊस आला की सर्वप्रथम हळदची लागवड केली जाते. हळद पिकातच आंतरिक पीक सुद्धा घेतले जाते. त्यात अरंडी, मिरची, भेंडी, टमाटर, वाल, काकडी आदि पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी हळद उत्पादकांनी विक्री करण्याकरिता तयार केली, परंतु पाहिजे तेवढे बाहेरगावचे व्यापारी न आल्याने कवडीमोल भावाने हळद विकावी लागली.

यावर्षी चांगला भाव मिळेल या आशेवर हळद उत्पादक शेतकरी दिसून येत होते. हळदीच्या पिकात नवीन वाण आले. त्यामुळे शेंदुरजनाघाट परिसरातील हळदीची मागणी कमी झाली. त्यामुळे कमी भावाने हळद विकावी लागत असून ते उत्पादन शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी खोदलेली हळद न उकळता ओली विकली, तर काहींनी हळदीचे बी विकले. शेंदुरजनाघाट येथे हळदीचे दोन उकाडे चालायचे. परंतु दिवसेंदिवस हळद परवडत नसल्याने उत्पादन कमी झाले आणि आज हळद लागवड करण्याकरिता जमीन मिळत नसल्याने अनेकांनी हळदीकडे पाठ फिरविल्याने शेंदुरजनाघाट परिसरातील हळदीचा रंग फिका पडला आहे.

पीक घेणे झाले कठीण
हातमजुरीवर शेती करून उपजीविका करणाऱ्या हळद उत्पादकांना पीक घेणे कठीण झाले आहे. हळद हे खर्चिक पीक असून त्या तुलनेत उत्पादकांना परिश्रमाचे मोल मिळत नाही. त्यामुळे हळदीचा पेरा कमी झाला आहे. 
- सुधाकर चोपडे, शेंदुरजनाघाट

पीक नामशेष होण्याच्या मार्गावर
हळदीचे पीक दहा महिन्यांचे असून पेरणीपासून तर काढणीपर्यंत व काढल्यानंतर १८ दिवस वाळवून घरी आणेपर्यंत फार मोठा खर्च होतो. त्या तुलनेत हळदीला भाव मिळत नाही. त्यामुळे हळदीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
- विलास तरार, शेंदुरजनाघाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com