यवतमाळ : कोरोनाचे संकट असले तरी कृषी विभागाने खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन केले आहे. या हंगामात बियाणे तथा कृषी निर्विष्ठांचा काळाबाजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे.
खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी खरीप हंगामासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारदारांनी कृषी निविष्ठांच्या अडचणीबाबत तक्रारी नोंदविताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा लागणार आहे. बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येते. छापेमारीदेखील करण्यात येते. तरीदेखील पूर्ण:ता काळाबाजार रोखता येत नाही, ही चिंताजनक बाब आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.