कोरोनाचे निदान आता तासभरात; बुधवारपासून होणार रॅपिड ऍन्टीजन चाचणी 

corona test
corona test

अमरावती  : कोरोनाचे निदान अवघ्या एका तासात करणाऱ्या रॅपिड ऍन्टीजन चाचणीला बुधवारपासून (ता. आठ) जिल्ह्यात सहा केंद्रांवर सुरुवात होत आहे. यापैकी दोन केंद्र महापालिका क्षेत्रात तर उर्वरित चार केंद्र ग्रामीण भागात ठेवले जाणार आहेत. 

कोरोना चाचणी गतीने व्हावी, अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान चाचणीचे प्रमाण वाढविण्यावर जोर देण्याची सूचना केली होती. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या रॅपिड ऍन्टीजन चाचणीसाठी आवश्‍यक किटची मागणी नोंदविली होती. त्यानुसार सहा हजार किट उपलब्ध झालेल्या आहेत. संशयित रुग्णांची रॅपिड ऍन्टीजन चाचणी घेण्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात डॉक्‍टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांना सोमवारी (ता.सहा) प्रशिक्षण देण्यात आले. उर्वरितांना मंगळवारी (ता. सात) प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या चमूचे गठण करून बुधवारपासून रॅपिड ऍन्टीजन चाचणीला सुरुवात होईल. 

महापालिका क्षेत्रात बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल तसेच अन्य एका ठिकाणी चाचणी केंद्र ठेवले जाईल, तर ग्रामीण भागात चार ठिकाणी केंद्र स्थापन केले जातील. त्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने चालविलेले आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. रॅपिड ऍन्टीजन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही शंभर टक्के पॉझिटिव्ह असते. मात्र, अतिधोकादायक संपर्कातील व्यक्ती निगेटिव्ह आलेली असली तर त्याचा नमुना मात्र विषाणू चाचणी प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर यंत्रात तपासावा लागतो, अशी पूरक माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

75 टक्के रुग्ण लक्षणविरहित 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संक्रमित आढळलेल्या सुमारे 700 रुग्णांपैकी 75 टक्के रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. अशा व्यक्तींचा शोध घेणे कठीण आहे. लक्षणेविरहित व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला असल्यास त्याने स्वतःहून विलगीकरण व चाचणी करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

सामाजिक वर्तनात सुधारणेची गरज 

कोरोनापासून दूर रहावयाचे असल्यास थेट भेट टाळणे, मॉस्क लावणे आणि हात साबणाने वारंवार धुणे या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. सामाजिक वर्तनात सुधारणा करणे, ही प्रत्येकाची गरज झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com