माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच... 

Due to Corona, the first newly wed festival is in Sasurwadi
Due to Corona, the first newly wed festival is in Sasurwadi

अमरावती : उन्हाचा सुट्यांचा काळ असल्याने या दिवसांत मोठ्या प्रमाणात लग्नकार्य उरकले जातात. यंदा कोरोनामुळे बऱ्याच जणांना लग्नाचा मुहूर्त साधता आला नाही. तरी पाच-पन्नास वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी विवाह पार पडले. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा सुरू होताच माहेरचे वेध लागतात. पावसाच्या सरींसोबतच तिचे मन माहेरच्या वाटेवर लागते. आषाढ महिना उजाडताच पुढचे दहा दिवस कसे जातात, याचाच विचार तिच्या मनात असतो. कारण आई-बाब, भाऊ बहिणींच्या आठवणी तिच्या मनात रुंजी घालत असतात. परंतु यंदा माहेरवाशीणीची ही वाट अडली आणि पहिला आषाढसणही तिला सासरीच साजरा करावा लागला. त्याची कारणेही आहेत... 

सासुरवाशिणींची पहिल्या आषाढीला माहेरी परतण्याची वाट यंदा कोरोनाने रोखली. सासरी असलेल्या मुलींना यंदा पहिल्या सणालाही माहेरी येता आले नाही. त्यामुळे सासरीच माहेर अनुभवत पहिला सण साजरा करावा लागला. विवाहानंतर सासरी असलेल्या मुलींना आषाढातील पहिल्या आषाढी पौर्णिमेला माहेरी आणण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मातील हा पहिला सण मुली माहेरी करतात. जावयालाही त्यासाठी निमंत्रण दिले जाते व मुलीला साडीचोळीसह जावयाला भेटवस्तू देत सत्कार केला जातो. त्यानंतरच पाठवणी होते. पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला राहत असल्याने तिच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. 

मात्र, यंदा कोरोनाने त्यावर पाणी फेरले. माहेरी आल्यावर मन मोकळे करण्याची, सासरी कशी वागणूक मिळते, त्याचे रसभरीत वर्णन करण्याची व तिथे कसे वागायचे ही शिकवण मिळण्याची संधी कोरोनाने हिरावून घेतली. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवास करणे कठीण झाले आहे. महत्प्रयासाने गावी परतले तर आधी वैद्यकीय चाचणी व विलगीकरणास (क्वारंटाइन) सामोरे जावे लागते. पहिल्या सणाला येण्याचा आनंद यामुळे हिरावला जाण्याची भीती असल्याने अनेकांनी मुलींना माहेरी आणणे टाळले तर काहींनी माहेरी येणार नाही, असा निरोप देत माहेरच्यांना चिंतामुक्त केले. 

यंदा विवाहही मास्क घालून कोरोनाचे नियम पाळूनच झाले. वऱ्हाडीसुद्धा निमंत्रित करता आले नाही. अनेकांना विवाहाच्या तारखा रद्द कराव्या लागल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा विवाह कमी झाले. जे झाले त्यांना आदर्श विवाहाचा दर्जा दिला गेला. महामारीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध अधिक असल्याने सासूरवाशीणींना माहेरी परतणे कठीण झाले व गेल्या अनेक वर्षांतील पहिल्या सणाला विवाहिता माहेरी येऊ शकल्या नाही. माहेरही त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत राहले व त्या येणार नाहीत ही हुरहूर मनाला लागून राहिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com