चढ्यादराने सुरू आहे जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री

vegetables
vegetables

उमरखेड (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुढे ते वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडता येत आहे. मजूर, कामगार, शेतकरी, सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवनावश्‍यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. किराणा व भाजीपाला या दैनंदिन आवश्‍यक वस्तूंची चढ्यादराने विक्री करून किराणा व्यावसायिक व भाजीविक्रेते आपली चांदी करून घेत आहेत.
कोरोनाच्या संकटाने समस्त मानवजातीला हादरा बसला आहे. प्रत्येक व्यक्ती या विषाणूमुळे भयभीत झाला आहे. शासन आणि प्रशासन एक युद्ध म्हणून कोरोनाविरुद्घ लढत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. कित्येक लोकांना आपल्या घरची चूल कशी पेटवावी, ही चिंता सतावत आहे. 'लॉकडाऊन'मधून जीवनावश्‍यक बाबींना वगळण्यात आले आहे. त्याचा फायदा नफेखोर व्यावसायिक घेत आहेत. त्यांनी सामाजिक जाणीव अक्षरश: खुंटीला टांगल्याचे दिसत आहे. आधीच हातात पैसा नाही. त्यात पुन्हा वस्तूंचे दर वाढविण्यात आल्याचे कामगार, मजूरवर्गाच्या खिशावर आर्थिक ताण पडत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवून दुकानदार अवाजवी चढ्यादराने मालाची विक्री करीत आहेत. तेल साखर, गहू, तांदूळ, डाळ आदींवर 30 ते 40 रुपये प्रतिकिलो जादा दर आकारून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये कुणाच्याही हाताला काम नाही. आपल्या घरची चूल कशी पेटवावी, ही चिंता असताना किराणा व्यावसायिक मात्र अधिक नफा कमविण्याच्या मागे लागले आहेत. प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी कुणीही धजावत नसल्याने व्यावसायिकांचे फावत आहे. शिवाय, भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले आहेत. शेतात भाजीपाला सडत असताना व शेतकऱ्यांकडून भाजीविक्रेते कवडीमोल भावाने भाजी विकत घेत असताना भाजीपाल्याचे दर वाढलेच कसे असा प्रश्‍न सामान्य माणसाला पडतो. परंतु, उगीच कशाला कटकट लावून घ्यायची म्हणून कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. भाजीविक्रेते मात्र नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. याला प्रशासनाने पायबंद घालावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

"एफडीए'च्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची
उमरखेड येथील नागचौकात असलेल्या किराणा दुकानात बुधवारी (ता. आठ) पुसद विभागीय अन्न निरीक्षण अधिकारी व अन्न पुरवठा अधिकारी यांनी अचानक भेट दिली. किराणा दुकानदार चढ्यादराने किराणा वस्तूंची विक्री करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्याबद्दल दुकानदाराला जाब विचारला असता त्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केली. हा प्रकार ग्राहकांसमोरच घडला. प्रकरण पोलिसांत गेल्यावर त्या दुकानदाराच्या मदतीला शहरातील इतर व्यावसायिक धावून आले आणि अवघ्या काही वेळात प्रकरण रफादफा झाले. या प्रकरणाची चर्चा अजूनही शहरात सुरूच आहे.

चढ्या भावाने विक्री
सध्या बाजारपेठेत केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. आधीच कोरोनामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.अशातच जीवनावश्‍यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा भासवून चढ्या भावाने विक्री करण्यात येत आहे, अशी तक्रार प्राप्त झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
स्वप्नील कापडणीस
उपविभागीय अधिकारी, उमरखेड.


असे आहेत भाव
वस्तू      आधीचे     आताचे

तेल           85        100

साखर        35        40
गहू पीठ     135      150
तूरडाळ      88       100
शेंगदाणा    100      125
ज्वारी         30         35
चणाडाळ     50        60
तांदूळ          40       50

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com