कोरोनाने रोखला श्‍वास; ना खांदा, ना धार्मिक सोपस्कार

Death from corona is more painful
Death from corona is more painful

यवतमाळ  : मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीला मरण हे ठरलेलंच. कोरोनामुळे होणारा मृत्यू अधिक वेदनादायी झाला आहे. ना खांदा... ना रडारड... ना धार्मिक सोपस्कार..., कोरोनाबाधिताने अखेरचा श्‍वास घेतल्यावर थेट रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेले जाते. आप्तस्वकीयांविना इथे एकट्यालाच जळावे लागते. ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं. सुख-दु:खात खंबीर साथ दिली. अशा जीवलगाचा चेहराही बघता येऊ नये, त्यामुळे होणारी घालमेल, शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही.

"कोविड-19'ने माणसाच्या जीवन जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. एक, दोन, पाच, सात आकड्यांत होणारी मृत्यूसंख्या दिवसाला पंधराच्या घरात पोहोचली आहे. आगामी काळात हा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनातूनच व्यक्त होत आहे. गेल्या मार्च महिन्यात विदेशातून आलेला कोरोना शहरातून ग्रामीण भागात व आता प्रत्येकच घराच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. सुरुवातीला रुग्ण उपचारामुळे "पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' होत असल्याने लोकांना गांभीर्य कळले नाही. आता कुणाला वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पत्नी, मित्र, मैत्रीण आपल्या जिवाभावाच्या माणसाला गमवावे लागत आहे. 

इतरवेळीही मृत्यूही होतात. कोरोना काळात होणारे मृत्यू वेदना देणारे आहेत. कोरोनाचे नाव उच्चारताच ओळखीचे सोडाच नात्यातील माणसेही दूर जातात. कुटुंबातात अथवा ओळखीच्या कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला निरोप देण्यासाठी अख्खे गाव जमा व्हायचे, हे चित्र उलट झाले आहे. मृत व्यक्तीच्या घरी पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास रक्ताच्या नात्यातील व्यक्तीलाच अखेरचा चेहरादेखील बघायला मिळत नाही. आयसोलेशन वॉर्डातून शवविच्छेदनगृहात मृतदेह अंतिम संस्काराच्या परवानगीसाठी ठेवला जातो. 

नातेवाईकदेखील एका झटक्‍यात अंतिम संस्काराची परवानगी देतात. कुणाच्याही खांद्याविना, पीपीई किट घातलेले व्यक्ती रुग्णवाहिकेतून मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जातात. मृतदेहाला अग्नीच्या स्वाधीन करतात. ना गर्दी, ना शोकसभा, एकामागून एक चिता जळत राहते. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व अगदी बोटावर मोजण्याइतके उपस्थित असलेले लोक माघारी फिरतात. नातेवाईक घरी जाऊन क्वारंटाइन होतात. तर, कर्मचारी पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या अंत्यसंस्काराची तयारी करतात.


जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर

कोरोनाविरुद्धची लढाई प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी नॉनस्टॉप लढत आहेत. त्यांची जबाबदारी ते पार पाडत आहेत. कोरोनाला पराभूत करण्याची जबाबदारी कुण्या एकट्याची राहिली नाही. तो आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतो की काय, अशी स्थिती आहे. आतातरी बिनधास्तपण सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी प्रत्येकाने खांद्यावर घेणे काळाची गरज आहे. यासाठी मैदानात आले पाहिजे असे नाही तर, स्वत:सह कुटुंबातील व्यक्तीला सुरक्षित ठेवले तरी तुम्ही या युद्धातील सैनिक ठरू शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com