...म्हणून जिल्ह्याला यंदा या मोठ्या संकटाने तारले!

washim
washim

वाशीम : गत खरीप हंगामातील सोयाबीनची सोंगणी सुरू असताना परतीच्या पावसाने दीर्घकाळ मुक्काम ठोकला. परिणामी, एकीकडे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे हा पाऊस तूर, रब्बी हंगामातील पिकांसह, प्रकल्पांच्या जलपातळीत वाढ करणारा ठरला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याला जलसंकटाने तारल्याने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या नाहीत.


जिल्ह्याच्या भूगर्भाची रचना ही चारही बाजूंनी उताराची (उबड्या बशीप्रमाणे) आहे. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी भूगर्भात अत्यल्प प्रमाणात झिरपले जाऊन, उताराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहून जाते. परिणामी, फेब्रुवारी -मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात होते. मात्र, गतवर्षी सोयाबीनचे पीक सोंगणीच्या अवस्थेत असताना परतीचा पाऊस दाखल झाला. या पावसाने दीर्घकाळ मुक्काम ठोकल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनला जागीच अंकुर आले होते.

सोंगून ठेवलेले सोयाबीन जागीच सडले. तर ज्या शेतकर्‍यांनी शेतात सोयाबीनच्या गंज्या लावल्या होत्या, त्यामध्ये पाणी गेल्याने हे सोयाबीन खराब झाल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढावले होते. तर दुसरीकडे याच परतीच्या पावसामुळे तूर पिकाला फायदा झाला, जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली, सोबतच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचा पेरा देखील वाढला होता. तसेच सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा जाणवलीच नाही. रविवारी (ता.7) मृग नक्षत्र लागला. त्यामुळे आता मोसमी पाऊस कधी दाखल होईल हे सांगता येत नाही. या पावसावर जिल्ह्यातील पेरण्यांची स्थिती व प्रकल्पांची पाणी पातळी अवलंबून आहे. एकंदरीतच गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्याला जलसंकटातून तारले आहे. 

मध्यम प्रकल्प 
एकबुर्जी (वाशीम)..............30.83 टक्के 
सोनल (मालेगाव)..............23.05 टक्के
अडान (कारंजा)................37.23 टक्के
तालुका निहाय प्रकल्पातील जलसाठा
वाशीम ........36 प्रकल्प .....07.37 टक्के 
मालेगाव.......23 प्रकल्प......14.59 टक्के 
रिसोड .........18 प्रकल्प.....12.76 टक्के 
मंगरुळपीर .....15 प्रकल्प.....15.50 टक्के 
मानोरा .........25 प्रकल्प.....10.42 टक्के
कारंजा .........16 प्रकल्प.....23.61 टक्के 
एकूण ........136 प्रकल्प.....17.57 टक्के

जिल्ह्यातील 76 प्रकल्प कोरडे 
जिल्ह्यातील वाशीम तालुक्यात 23 प्रकल्प, मालेगाव तालुक्यातील 13, रिसोड तालुक्यातील 12, मंगरुळपीर तालुक्यातील 7, मानोरा तालुक्यातील 13, कारंजा तालुक्यातील 8 प्रकल्प कोरडे झाले आहेत. 

कोरोनामुळे ईतर समस्यांचा विसर
यंदा कोरोनाच्या संकटाने सर्वांना त्रस्त करून सोडले. उन्हाळ्याचा बहुतांश कालावधी हा लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरीच घालवला आहे. परिणामी नागरिकांना यंदा पाणीटंचाई सारखी समस्या देखील तीव्रतेने जाणवली नाही. तर जे नागरिक बाहेरून जिल्ह्यात दाखल झाले, त्यांनी सुद्धा स्वतः क्वारंटाईन झाले. तर बर्‍याच गावांत बाहेरून येणारे नागरिक ज्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी जाऊन राहणे पसंत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com