सांगा डॉक्‍टर, मला कोरोना तर झाला नाही ना? 

file photo
file photo

यवतमाळ : कोरोना संसर्गजन्य आजाराने जग आणि जीवन जगण्याचे संदर्भच बदलून टाकले. दूरचे सोडाच रक्ताचे नातेही परक्‍यासारखेच वागत आहेत. याच काळात कोरोना बाधित म्हटले की, त्याच्याकडे आपुलकीने नाही तर, तिरस्काराच्या भावनेने बघितले जाते. त्यामुळे बाधित रुग्ण मनातून पूर्णपणे खचून गेल्याचे चित्र बघावयास मिळते. तर, घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांच्या मनात चिंतेचे काहूर माजले आहे. "डॉक्‍टर, मला कोरोना तर झाला नाही ना?, अशी विचारणा "कोविड 19 मनोधैर्य' हेल्पलाइनवर केली जात आहे. 

"कोविड 19 मनोधैर्य' नावाची हेल्पलाइन सुरू 

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकृती शास्त्र विभागात "कोविड 19 मनोधैर्य' नावाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. प्रिया मडावी रुग्णांचे हेल्पलाइनद्वारे समुपदेशन करतात. दिवसाला जवळपास दहापेक्षा जास्त फोन येतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या चिंता आणि अस्वस्थता असलेले व्यक्ती संपर्क साधतात. सगळ्यात जास्त प्रमाण हे "मला तर कोरोना झाला नाही ना' ही भीती व्यक्त करणाऱ्यांची आहे. कोरोनाचा संसर्ग हा बहुतांशपणे आधीच इतर शारीरिक व्याधी असलेल्या लोकांना जास्त होतो. कोरोनाच्या भीतीचा आजार मुळात चिंता करण्याचा स्वभाव असलेल्या लोकांना होण्याची शक्‍यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या संकट काळात मानवी जीवनात निर्माण केलेल्या ताणतणावांचा पट खूपच मोठा आहे. आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना हा आजार होईल का, अशा चिंतेपासून ते हातावरचे पोट असलेल्या लोकांच्यासाठी आजची खाण्याची आणि निवाऱ्याची सोय काय होईल का, अशापर्यंतच्या चिंतेचा असा तो मोठा पट आहे. 20 ते 30 या वयोगटातील तरुण शिक्षण, व्यवसाय, नोकरी या चिंतेत आहेत. एकदा का चिंता मनात यायला लागली की, छातीत धडधड होणं, सतत बेचैन वाटणे, झोप न लागणे, भूक मंदावने, चिडचिड होणे, अशा अनेक गोष्टी व्हायला लागतात. कोरोना किती दिवस राहील. असुरक्षित वाटत आहे. नातेवाइकांची भेट झाली नाही. मुले दूर आहेत. हाताला काम नसल्याने पोट कसे भरायचे, अशा प्रकारच्या प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. मानसोपचार तज्ज्ञांकडून समाधान होईपर्यंत समुपदेशन केले जाते. 

ओपीडीत बोलावून उपचार 

चिंताग्रस्त लोक मानसोपाचारतज्ज्ञांकडे जायला सहसा टाळतात. एक अनामिक त्यांच्या मनात असते. कोरोनाच्या काळात हेल्पलाइनवर बोलण्याची हिंमत लोक करीत आहेत. जास्त चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीत बोलावून त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यामुळे त्यांचे जीवन पूर्वपदावर आले आहे. 

चिंता करू नये !

मनातली चिंता ही समुद्राच्या लाटेसारखी असते. समुद्राची लाट जशी हळूहळू वर जाते. एका सर्वोच्च बिंदूला पोचते आणि मग खाली येते. त्याचप्रमाणं ही चिंतेची लाट हळूहळू वर जाते. एका सर्वोच्च त्रासदायक बिंदूला पोचते आणि मग हळूहळू ओसरते. त्यामुळे ही चिंता ही तात्पुरती मनाला वाटणारी अवस्था आहे. चिंतेच्या लाटेत बुडून न जाता त्यावर स्वार व्हायला शिकता आले पाहिजे. जितकी चिंता आणि विचार जास्त करतो. तितका वेळ अधिक चिंतेच्या जाळ्यात गुंतत जातो. प्रत्यक्ष प्रश्‍न मागे राहतो आणि चिंतेचे दुष्टचक्र मन व्यापून घेते. सकारात्मक गोष्टींकडे मन वळविल्यास चिंतेतून बाहेर पडता येते. 

मानसिक आरोग्याची नीट काळजी घेतली नाही, तर सगळ्यात मोठा धोका हा चुकीची माहिती, अफवा किंवा अंधश्रद्धेला बळी पडण्याची शक्‍यता आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मनाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे मानसिक आरोग्य राखण्याची ही जबाबदारी आपल्यालाच पुढाकार घेऊन पार पडायची आहे. हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन केले जाते. गरज पडल्यास उपचारही करण्यात येतात. हेल्पलाइनमुळे अनेकांना त्याचा फायदाच झाला आहे. 
- डॉ. श्रीकांत मेश्राम,मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com