भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी आणले गावात; भंडाऱ्यातील वास्तव

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अर्धवट जळालेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणत आहेत. त्यांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे भिलेवाडा या गावात दुर्गंधी पसरली आहे. 
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अर्धवट जळालेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणत आहेत. त्यांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे भिलेवाडा या गावात दुर्गंधी पसरली आहे. 

भंडारा:  जिल्ह्यात जिवंत कोरोनाबाधित रुग्णांची मानसिक आणि शारीरिक प्रतारणा होत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, बाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही हाल होत असल्याचे वास्तव याच जिल्ह्यात समोर आले आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अर्धवट जळालेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणत आहेत. त्यांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे भिलेवाडा या गावात दुर्गंधी पसरली आहे. 

राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. यातून भंडारा जिल्हाही सुटला नाही. जिल्ह्यात दररोज बाधित रुग्णसंख्येत वाढ होत असताना मृत्यूचा आकडाही फुगत चालला आहे. ही जिल्हावासींसाठी धोक्‍याची घंटा आहे. औषधोपचारात होणारी हयगय, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना दररोजच नजरेस येते. रुग्णांना अडगळीत टाकून दिल्यासारखे विदारक अनुभव येत आहेत. जिवंतपणी या यातना आणि वेदनांनी विव्हळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे हाल मृत्यूनंतरही होतच असल्याचे जिवंत उदाहरण भंडाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिलेवाडा या गावात पाहायला मिळाले. 

करचखेडा (भिलेवाडा) पुनर्वसन या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. दररोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, मृतदेह जाळतेवेळी प्रशासनाचे कर्मचारी लाकडे कमी टाकून मोकळे होत असल्याने हे मृतदेह अर्धवट जळालेली असतात. त्यामुळे बेवारस कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहांवर ताव मारणे सुरू केले आहे. काही मृतदेह ओढून कुत्रे गावात आणत आहेत. त्यामुळे गावांत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. 

एकीकडे कोरोनाचा उद्रेक असताना गावकरी भीतीयुक्त वातावरणात आहेत. दुसरीकडे दुर्गंधी पसरल्याने आणखी आजार उद्भवण्याची आणि रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय म्हणजे, एकट्या भिलेवाडा या गावात बाधित रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. चार जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. दरम्यान, प्रशासनाने दखल घेऊन मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतरच स्मशानभूमीतून काढता पाय घ्यावा, अशी मागणी होत आहे.    

अर्धवट जळालेले मृतदेह कुत्रे गावात आणत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, आजार वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने करचखेडा (भिलेवाडा) येथील स्मशानभूमी त्वरित बंद करावी, अशी आपली मागणी आहे. तसे निवेदनही ग्रामपंचायतीने दिले आहे.
- विनोद बांते, 
उपसरपंच, भिलेवाडा.    

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com