चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून शाळांच्या पायाभूत विकासावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. या निधीतून शाळांत ई-लर्निंग, बोलक्या भिंती, शौचालय यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. मात्र, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. जिल्ह्यातील तब्बल एक हजार ११७ शाळांत नळाची सुविधाच नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना विहीर, हातपंपांच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. अलीकडेच जल जीवन मिशन राबविण्यात आले. याच मिशनमधून ही माहिती समोर आली आहे. आता ज्या शाळांत नळाची सुविधा नाही. तेथे नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या शाळांत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांत टप्प्याटप्प्यांनी ई-लर्निंगची सुविधा केली. त्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी ई-लर्निंगच्या माध्यमातूनच शिक्षण घेत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. खासगी शाळांतही बऱ्यापैकी सुविधा आहेत. मात्र, अनेक शाळांत नळाद्वारे पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे विहीर, हातपंपावरील पाण्यावरच विद्यार्थ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रात नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याकरिता पंतप्रधानांनी शंभर दिवसांच्या एका विशेष मोहिमेची घोषणा केली. या मोहीमेचे नाव जल जीवन मिशन असे आहे. या मिशनअंतर्गत जिल्ह्यात किती शासकीय, खासगी शाळा आहेत. शासकीय आश्रमशाळा, खासगी आश्रमशाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात त्या शाळांत पाण्याची कोणती सुविधा याची माहिती विचारण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ११७ शाळांत नळाची सुविधाच नसल्याची माहिती समोर आली.
३१२ शाळांत विहिरीचे पाणी -
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळा आहेत. खासगी शाळांची संख्या ४६१ इतकी आहे. शासकीय आश्रमाळा १४, तर खासगी आश्रमशाळांची संख्या सोळा इतकी आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ६१ शासकीय आणि खासगी शाळा आहेत. त्यापैकी ९४४ शासकीय आणि खासगी शाळांत नळाची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३१२ शाळांत विहिरीचे पाणी पिऊन विद्यार्थी आपली तहान भागवतात, तर ८०५ शाळांतील विद्यार्थ्यांना हातपंपांचा आधार असल्याचे स्पष्ट झाले.
अनेक शाळांत नळाचे कनेक्शन नाही. जिथे नाही तिथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून नळ कनेक्शन लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच सगळ्याच शाळांत नळ कनेक्शन लावण्यात येईल.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्रा) जिल्हा परिषद चंद्रपूर.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.