अवकाळीमुळे धानाला फुटले अंकुर 

file photo
file photo

भंडारा : जिल्ह्यातील 63 शासकीय आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी ठप्प पडली आहे. शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. अवकाळी पावसाने पोती भिजल्याने धानाला अंकुर फुटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. अंदाजे कोट्‌यवधी रुपयांचा धान पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारकडे गोदाम नसल्यामुळे दरवर्षी असे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

खरेदी केंद्रावर धानाची पोती पडून

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास प्रत्येकच शासकीय खरेदी केंद्रावर धानाची पोती पडून आहेत. पोत्यांमध्ये पाणी शिरून धान अंकुरले आहेत. त्यामुळे भिजलेले व अंकुरलेले धान घेण्यास केंद्रावर नकार दिला जात आहे. निसर्गाची मार आणि खरेदी केंद्रावरील मनमानी कारभारामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रांवर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवले आहेत. नियोजन नसल्याने अनेक दिवस धानाची मोजणी होत नाही. त्यामुळे धान भिजत आहेत. 30 डिसेंबरपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने पोती भिजली. यात धानाची होत असलेली नासाडी पाहून शेतकऱ्यांत तीव्र संताप आहे. 

दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव

सध्या खुल्या बाजारात बारीक धानाला दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. तर शासकीय धान केंद्रावर बोनससह 2500 रुपये भाव जाहीर झाल्याने शासकीय केंद्रावर ठोकळ धानासह बारीक धानाची आवक वाढली आहे. धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम खरेदीदार संस्थांकडे नाहीत. राइस मीलर्सकडून भरडाईसाठी धान उचलण्यास विलंब होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास दिरंगाई केली जात आहे. 15 दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदीविना उघड्यावर पडून आहेत. ओले व अंकुरलेले धान खरेदी करण्यास केंद्रावर मनाई केली जात असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

बारदाण्यांचा तुटवडा 

गोंदिया आणि भंडारा जिल्हृयात दरवर्षी कोट्‌यवधी रुपयांची धान खरेदी होते. सरकारकडून आधारभूत धानखरेदी केंद्रावर ही खरेदी केली जाते. मात्र, दरवर्षी बारदाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. बारदाणा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्‌यावर असतात. अवकाळी पाऊस आल्याने उघड्‌यावर असलेले धान भिजून जातात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे दरवर्षी यासंदर्भात निवेदन दिले जाते. परंतु, तेही लक्ष देण्यास तयार नाही. जिल्ह्यातील 63 धानखरेदी केंद्रावर ही समस्या आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनसुध्दा लक्ष देत नाही, असा आरोप होत आहे. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पावसात धान भिजल्यामुळे धानाला आता अंकुर फुटले आहेत. हा धान आता पूर्णपणे खराब झाला आहे. त्याला भाव मिळेल किंवा नाही, याची काही शाश्‍वती नाही. आधारभूत धानखरेदी केंद्रावर नैसर्गीक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी वेगळी कोणतीही सोय नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला ठेवलेले धानाचे पोते वेळेवर पाउस आल्यास दुसरीकडे नेण्यास वेगळी सोय नसते. त्यामुळे धान पाण्यात भिजून जाते. यातून शेतक-यांचे मोठे नुकसान होते. सरकारने धानखरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी शासनाने त्या परिसरात सोय करावी, अशी मागणी होत आहे. 


सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. दरवर्षी हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर येतो. तरीही सरकार कायमस्वरुपी उपयायोजना करीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकारने लक्ष घातल्यास त्यांचे मोठे नुकसान टाळता येईल. 
-पुंडलिक घ्यार, 
शेतनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी, कोटलपार ता. पवनी 

 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com