गडचिरोली : मोठ्या संख्येने तलाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयात अर्थात गडचिरोली शहरात भव्य तलाव आहे. मात्र, या तलावाची दुर्दशा सुरू असून, अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. घाणीचे साम्राज्य आहे. काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. पण, काही दिवसांतच ते बंद पडले. तेव्हापासून या तलावाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा आहे.
गडचिरोली शहरात गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर डाव्या बाजूला भव्य तलाव आहे. हा तलाव अतिशय विस्तीर्ण असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. पण, या महत्त्वाच्या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे कधीच लक्ष देण्यात आले नाही. फक्त गणेशविसर्जनाच्या दिवसांत येथील घाटाची थोडी डागडुजी व पाळीची दुरुस्ती करण्यात येते. खरेतर या तलावाची नीट देखभाल व सौंदर्यीकरण झाल्यास नागरिकांना विरंगुळ्यासोबतच एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून या जागेचा विकास करता येऊ शकतो.
शिवाय शहरातील अनेक नाल्यांचे घाण पाणी व घरांतील सांडपाणी याच तलावात जाते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्यीकरण करून येथे बोटिगची व्यवस्था करत एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.