स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही "ती' 30 गावे रात्रीच्या काळोखात होतात गायब 

melghat
melghat

अचलपूर (जि. अमरावती)  : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी जनता अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहे. अनेक गावांमध्ये अद्याप वीज, रस्ते आणि पाणी या पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. यामध्ये धारणी तालुक्‍यातील सहा गावे, तर चिखलदऱ्यातील 24 गावे याची ज्वलंत उदाहरणे ठरली आहेत. याकडे स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याने ही गावे अंधारातच आहेत. 

राज्य सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मेळघाटमध्ये निधी खर्च करण्यात येतो. तरीसुद्धा मेळघाटातील बहुतांश गावे विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते. धारणी तालुक्‍यातील रंगुबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार तसेच चिखलदरा तालुक्‍यातील मारिता, माखला, चुनखडी, खडीमल, बिच्चूखेडा इत्यादी 24 गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही वीज पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी मेळघाटात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. 

शासकीय योजनांना भ्रष्टाचाराची कीड

मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो 1993 मधील कुपोषणाचा उद्रेक आणि त्यानंतरचे बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमांतून उघड झाले. त्यानंतर शासनाने मेळघाटकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कुपोषणाच्या नावाखाली दरवर्षी विविध विभागांमार्फत कोट्यवधींचा निधी येतो. मात्र योजनांची अंमलबजावणी योग्य होत नसल्याने व शासकीय योजनांना भ्रष्टाचाराची कीड लागल्याने आदिवासी बांधव खोल गर्तेत अडकला आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या प्रकारात मोडणाऱ्या वीजपुरवठ्याची स्थिती आजदेखील तशीच आहे. धारणीतील सहा तर चिखलदऱ्यातील 24 गावांमध्ये विजेचे खांब पोहोचले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे गावात ना मोबाईल, ना विजेवर चालणारी कुठली उपकरणे, केवळ रात्रीचा काळोख अशीच ओळख या गावांची राहिली आहे. 

गावांत पोहोचण्यासाठी रस्तासुद्धा नाही

विशेष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची खेडी कशी असावीत हे या गावांमध्ये भटकंती केल्यास कळू शकेल. काही गावांत पोहोचण्यासाठी रस्तासुद्धा नाही. या गावांमध्ये पोहोचणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. दुचाकीचा प्रवास मोठ्या मुश्‍किलीने केला जाऊ शकतो, अशी या गावांची अवस्था आहे. या व्यतिरिक्त गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणीसुद्धा नाही. केवळ आपल्या गावाची कधी तरी परिस्थिती सुधारेल व आपणही इतरांप्रमाणे प्रकाशात वावरू, या आशेवर या गावांतील अनेक पिढ्या जगत आहेत. 
दरम्यान, विजेच्या या समस्येसंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मेळघाटातील शेकडो गावे दुर्गम भागात तसेच जंगलांमध्ये असल्याने विजेचे खांब टाकण्यात किंवा लाइन घेण्यात अडचण येत असल्याची माहिती आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 


मेळघाटात राहणारा आदिवासी समाज हा माणूसच आहे. माणूस या नात्याने त्यांना वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत गरजा पुरविल्या पाहिजेत. परंतु अद्यापही मेळघाटातील जनतेच्या नशिबी अठराविश्‍वे दारिद्य्र कायम असून त्यांना पायाभूत सोयीसुद्धा दिल्या जात नसल्याची गंभीर स्थिती आहे. 
-ऍड. बंड्या साने, खोज संस्था. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com