ऑनलाइन शिक्षणाचे फॅड : चंद्रपुरचे मुले म्हणतात, बाबा आधी मोबाईल, नंतर शाळा

file photo
file photo

राजुरा(चंद्रपूर) : दोन महिन्यांपासून देशात टाळेबंदी आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यातच शाळा बंद केल्या. द्वितीय सत्राच्या परिक्षा रद्द झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी राज्यात ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. याचा परिणाम आता गावखेड्यात बघायला मिळत आहे. पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पालकांची मोबाईल दुकानात गर्दी बघायला मिळत आहे. पहिले मोबाईल नंतर शाळा अशी अवस्था सर्वत्र आहे. 

पालकांचे व्हॉट्‌सअप ग्रुप 

टाळेबंदीतही शैक्षणिक कार्य सुरू रहावे, यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना केली आहे. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्‌सअप ग्रुप बनविण्यात आले. या अनुषंगाने शाळांतील शिक्षकांनी पालकांचे व्हाट्‌सअप नंबर शोधण्याची शोधमोहीम सुरू केली. पालकांचे व्हाट्‌सअप ग्रुप बनवून पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमाची माहिती देण्यात आली. महिनाभरापासून शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'शाळा बंद - पण शिक्षण सुरू आहे' या सदराखाली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून प्रत्येक विषयावर ऑनलाईन माहिती देण्यात येत आहे. वर्गनिहाय व विषय निहाय शैक्षणिक लिंक व्हाट्‌सअप ग्रुप वर प्रसारित करण्यात येत आहे. 

मोबाईल नसणारे विद्यार्थी  वंचित 

हा उपक्रम टाळबंदीत सुरू झाल्यामुळे "स्मार्टफोन'नसणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागले. आता विद्यार्थ्यांचा मोबाईलसाठी हट्ट सुरु झाला. पालकांनाही याबाबतची पूर्वकल्पना असल्यामुळे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी साठी जुळवाजुळव सुरू केली. बाजारपेठ सुरू होताच पालकांनी मोबाईल शॉपिंग मध्ये गर्दी केली. मात्र संपूर्ण उद्योगधंदे बंद असल्यामुळे मागणीनुसार पुरवठा कमी आहे. पालक आठवडाभरापासून मोबाईल खरेदीसाठी 'वेटिंग'वर आहेत. काही वर्षांपूर्वी शालेय वेळात शाळातून मोबाईल वापरावर प्रतिबंध घालण्यात आले होते. मात्र काळानुरुप त्याच मोबाईल ने ऑनलाईन शिक्षणात आपले महत्त सिद्ध केले आहे. टाळेबंदीच्या चवथ्या टप्प्यात मोबाईल खरेदीसाठी दुकानात पालकांची गर्दी वाढली आहे. 

 ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल खरेदी अचानक वाढली आहे. मात्र टाळेबंदी असल्यामुळे मोबाईलचा पुरवठा बंद आहे. मागणीनुसार मोबाईल पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांना अपेक्षेप्रमाणे मोबाईल मिळत नाही. जिल्ह्याच्या होलसेलकडेही मोबाईलचा तुटवडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किरकोळ दुकानदारांच्या मोबाईल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

टाळेबंदीत शिथीलता मिळाल्यानंतर आम्ही दुकाने सुरू केलेली आहेत .मागील आठवडाभरापासून स्मार्टफोनची मागणी वाढलेली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी पालकांकडे आग्रह धरीत आहेत. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक दररोज मोबाईल खरेदीसाठी येत आहेत. माझ्या दुकानातून जवळपास दररोज 15 ग्राहक वापस जात आहेत. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे पालक वेटिंग वर आहेत. 
-दीपक रागीट, मालक, लक्ष्मी मोबाईल शॉपी, राजुरा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com