पावसाने पिकाचे नुकसान, शेतकऱ्याने पाच एकरातील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर
तिवसा (अमरावती): आधी दुबार पेरणीचे संकट आले. त्यात आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन खोडकिडीने तसेच नंतर आलेल्या परतीच्या पावसाने खराब झाले. यामुळे काढायलाही न परवडणाऱ्या सोयाबीनवर हताश झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच फिरवला. राजू सांभारे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. त्यामुळे पिकासाठी लागलेला खर्च देखील निघाला नाही. शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करतो आहे. सोयाबीन काढणीला परवडत नसल्याने तिवसा तालुक्यातील मालधुर येथील राजू सांभारे या शेतकऱ्याने ५ एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
सर्व पीक वाढविण्यासाठी या शेतकऱ्याला जवळपास दीड लाखांचा खर्च आला होता. मात्र, अती पाऊस आणि खोडकिडीने सोयाबीन पूर्ण खराब झाले. त्यामुळे सोयाबीन कापूनही उत्पादन मिळेलच याची शाश्वती नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्याने निराश होत उभ्या सोयाबीनच्या शेतात ट्रॅक्टर फिरवित सोयाबीन पीक मोडून काढले. नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे. सरकार शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी उजळणार का? हा प्रश्न आहे.
माझी साडेदहा एकर शेती आहे. त्यात मी पाच एकरात सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला पीक चांगले होते. मात्र, नंतर आलेल्या पावसामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले. माझा खर्चही जवळपास एक लाख 35 हजार झाला. इतका खर्च करून देखील उत्पन्न झाले नाही. त्यामुळे आज भाड्याने ट्रॅक्टर आणून पूर्ण शेतात चालवला. आता फक्त शासनाची मदत केव्हा येईल याची वाट बघतो आहे.
- राजू सांभारे, शेतकरी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.