शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ संपता संपेना, आता धान खरेदी खोळंबली

Farmers rounds at Grain Shopping Center
Farmers rounds at Grain Shopping Center

आसगाव (जि. भंडारा)  : आधारभूत धानखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी ज्या गोडाऊनची व्यवस्था करण्यात आली ते बहुतेक हाऊसफुल्ल झाले आहेत. उर्वरित भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे धान मोजणी खोळंबली आहे. शेतकरी धान मोजण्यासाठी लवकर नंबर लागावा म्हणून कमालीचे कष्ट घेत आहेत. परंतु, आता त्यांच्या कष्टात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पवनी तालुका धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला विभाग आहे. शेतकरी आणि गावांच्या संख्येच्या तुलनेत हमीभाव खरेदी केंद्र व गोडाऊन उपलब्ध नाही. या तालुक्‍यात आधारभूत धानखरेदी केंद्रांची संख्या फक्त आठ आहे. तालुक्‍यातील गावांची संख्या 157 आहे. म्हणजे एका केंद्रात जवळपास 19 ते 20 गावांतील शेतकऱ्यांना यावे लागते. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. सदोष नियोजनामुळे आठही केंद्रांवर आतापर्यंत नोंदणी केलेल्या पहिल्या 200 ते 225 शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी करून खरेदी करण्यात आली आहे. परंतु, प्रत्येक केंद्रात एक ते दीड हजार शेतकरी त्यांचा धान विक्रीसाठी "वेटिंग'वर आहे.

अधिक वाचा - Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत मुथूट फायनान्सवर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास

 
आतापर्यंत झालेल्या खरेदीतच केंद्रांचे गोडावून हाऊसफुल्ल झाले आहेत. तालुक्‍यातील पवनी, कोदुर्ली, खातखेडा या केंद्रातील गोडाऊन भरल्याने आठ ते दहा दिवसांपासून धानाची मोजणी बंद आहे. तसेच आसगाव, कोंढा, चकारा, गोसे येथील केंद्रांचे गोडावूनसुद्धा लवकरच तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईचा अजून पत्ता नाही. एकाही केंद्रातील धान भरडाईसाठी पाठवण्याचा आदेश अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. त्यामुळे या सर्व केंद्रांवर धानविक्रीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

विक्रीसाठी सतराशे विघ्न

यावर्षी खरिपात धानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच अवेळी आलेल्या पावसाने धान पूर्णतः भरलेला नाही. धानाचे वजन हलके येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा धान केंद्रावरून परत पाठवला जात आहे. त्याला पुन्हा थ्रेशर मशीनमध्ये टाकून उडवावा लागतो. त्यानंतर हलके धान वगळून इतर धान परत विक्रीसाठी आणावे लागतात. यात त्यांना दोन वेळचा वाहतूक खर्च, थ्रेशरचे भाडे असा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. आधीच उत्पादन कमी त्यातही सतराशे विघ्न येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सर्व शेतकऱ्यांचे धान मोजणार

पवनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी २८ डिसेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने तहसीलदारांनी शेतकरी प्रतिनिधी व मार्केटिंग अधिकारी यांची चर्चा घडवून आणली. यात अधिकाऱ्यांनी टोकन दिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या मालाची ३१ मार्चपर्यंत मोजणी करण्याचे हमी दिली. तसेच धान खरेदीदरम्यान बारदान्याचा तुटवडा पडू देणार नाही. पवनी बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करणे, समितीच्या गोडाऊनमध्ये साठवणूक करणे, गोडाऊन हाऊसफुल्ल झाल्यावर उघड्यावर खरेदी सुरू ठेवणे आणि केंद्रांत वजनकाट्यांचे व कर्मचारी वाढवण्याचे निर्देश संबंधित केंद्रांना दिले आहेत. या सर्व मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी सेवक त्र्यंबकेश्‍वर गिऱ्हेपुंजे यांनी कळविले. 


संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com