शेतकर्‍यांना लागली आता या विषयी चिंता, पहा काय झाले असे...

washim farmer.jpg
washim farmer.jpg

रिसोड (जि.वाशीम) : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामही शेतकर्‍यांसाठी जगण्याची कसोटी पाहणारा ठरणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अद्यापही आर्थिक घडी सावरण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे आगामी खरीप हंगामही शेतकर्‍यांसाठी अडचणीचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

नोटाबंदी, सलग तीन वर्षे दुष्काळ त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा जगण्यासाठी कस लागत आहे. नोटाबंदीपासून मोडलेला शेतकरी त्यानंतर आलेला सलग दुष्काळ, बाजारात कवडीमोल मिळणारे भाव, व यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पार कोलमडला आहे. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर या प्रमुख पिकांची उत्पादकता घटली आहे. त्यातच बाजारात खरिपातील सर्वच पिकांना कवडीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. अशा स्थितीत यावर्षी शेतकर्‍यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे टिकून असतानाच अवकाळी पावसाने अखेरच्या क्षणी हरभरा, संत्रा, गहू आदी पिकांना नेस्तनाबूत करून टाकले. 

त्यातच रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या हरभर्‍याचे दरही बाजारात सरासरी 3500 मिळाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडून पडले. या स्थितीत आता कोरोना विषाणूने शेतकर्‍यांवरील संकट गहिरे करून टाकले आहे. खरिपापाठोपाठ रब्बीतही जबर आर्थिक नुकसान सोसावे लागत असताना आगामी खरीप हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांच्या हातात तुटपुंजा पैसा आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे स्थिती बिघडत असल्यामुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या जगण्याची कसोटी पाहणार ठरणार आहे. खिशात पैसे नसताना शेती उभी करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाचे नियोजन पण आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले. 

परंतु, कोरोनाची सद्यस्थिती पाहता लॉक डाऊनची मुदत ता. 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे खते व बियाणे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी हंगामात शेतकर्‍यांना किती प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होईल, याबाबत आतापासूनच शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प, नोटबंदीची आठवण, बाजार समित्यांमध्ये मर्यादित आवक असल्याने बंद सदृष्य स्थिती निर्माण झाली. कापूस खरेदी बंद असल्याने अनेक शेतकर्‍यांचा कापूस घरात पडून आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असला तरी भाडे व मजुरी देताना शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. कोरोनामळे निर्माण झालेल्या अडचणींमळे पुन्हा नोटा बंदीची आठवण ग्रामीण भागात होत असून, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com