Video : उपाशी मरण्यापेक्षा चला पायीच निघुया, निश्चय केला अन् पायीच कापले ५०० किमी अंतर

gondpimpari
gondpimpari

गोंडपिंपरी (जि.चंद्रपूर) : कोरोनाच्या संकटकाळात मजूर, कष्टकऱ्यांचे हाल होताहेत. लॉकडाऊनपासून काम थांबलेलं. आधार कार्ड दाखवून कुणी अन्नधान्य द्यायला तयार नाही. अशा संकटाला कंटाळून तेलंगणातील काझीपेठ येथून 13 एप्रिल रोजी मजुरांचे बिऱ्हाड निघाले. त्यांना गोंदियाला स्वगृही परतायचे होते. सात दिवसांचा पायी प्रवास करीत काल ही मंडळी गोंडपिपरीत आली. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली अन् उपाशीपोटीच भोंग्याचा आधार घेत त्यांनी रात्र काढली. पहाटेच पुढच्या प्रवासाला निघाले. उपासाने पोट खाली गेलेले पण ते वढोलीच्या अंधारी नदीपर्यत गेले. चालणेही अशक्य झाल्याने ते तिथेच थांबले. अशावेळी वढोलीतील किराणा दुकानदार युवकाला कष्टकऱ्यांच्या वेदना पाहावल्या नाहीत. त्याने संपूर्ण बिऱ्हाडाची जेवणाची, आरामाची व्यवस्था केली. 

रोजीरोटीसाठी गोंदिया जिल्ह्यातील सोनदळ, शेंडा येथील जवळपास पंचेवीस मजूर तेलंगणातील काझीपेठ परिसरात गेले होते. तीन महिने काम करून पैसे कमवायचे मग त्याच भरवशावर संपूर्ण वर्ष काढायचे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी याच पद्धतीने काम करीत आहे. पण यंदा कोरोनाचे संकट आले अन् होत्याचे नव्हते झाले. लॉकडाऊनमध्ये सारेच काम थांबले. जमा झालेले पैसे खर्च होत आले. 

अशात आधार कार्ड दाखवून देखील अन्नधान्याची सोय होत नसल्याने मजुरांच्या बिऱ्हाडात चिंतेचे सावट पसरले. काय करावे हा विचार करताना अशीच स्थिती राहिली तर भुकेने मरायची वेळ येईल, ही भीती त्यांना होती. मग काय बिऱ्हाडाने निर्णय घेतला पायीच निघायचे. काझीपेठ ते गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरेगाव तालुका. हे अंतर 500 किलोमीटरचे पण त्याची तमा न बाळगता ते 13 एप्रिल रोजी काझीपेठवरून पायीच निघाले. मुख्य मार्गावरून जाताना पोलिस अडवतील ही भीती होती. त्यामुळे शेतातून बिकट वाट काढत ते निघाले. तब्बल सात दिवसांच्या पायी प्रवासानंतर ते रात्री गोंडपिपरीत पोहोचले. रात्र झाल्याने बिऱ्हाड रस्त्यावर थांबले. पण मध्यरात्री पावसाने झोडपले. अशावेळी रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या भोंग्यातच बिऱ्हाडाने उपाशीच रात्र काढली.

रात्रीचा उपास, पोट खाली गेलेले अशाही स्थितीत ते वढोलीच्या अंधारी नदीपर्यंत गेले. पण पुढे चालणे शक्य नव्हते. यामुळे नदीच्या तिरावर ते थांबले. वढोली येथील किराणा दुकानदार व युवा कार्यकर्ता सूरज माडूरवार यांना ही माहिती मिळाली अन् मग त्यांनी या मजुरांची भेट घेतली. त्यांचा वेदनादायी प्रवास व सात दिवसांच्या  संघर्षाने माडूरवारांनी या बिऱ्हाडाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

नदीलगतच असलेल्या राईस मिल येथे या बिऱ्हाडासाठी माडूरवार यांनी जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली वढोलीतील, मोहन चुधरी, साई कोहपरे, सुरेश रणदिवे, सूरज भोयर, नबात सोनटक्के, गुरुदास अलोणे, गोकुळ सोनटक्के, राकेश बुटले व अमित भोयर हे कार्यकर्ते सोबतीला आले.

यानंतर स्वयंपाक करून बिऱ्हाडातील 25 सदस्यांना त्यांनी भरपोट जेवू घातले. पोटभर जेवण झाल्यानंतर ही मंडळी पुढच्या प्रवासाला निघाली. यावेळी पुढच्या 40 किलोमीटर अंतरावर त्यांच्या खाण्यापिण्याचे  नियोजन माडूरवार यांनी केले. कोरोनाच्या संकटात काही देवदूत ठरत आहे. वढोलीच्या सूरज माडूरवार यांनी प्रत्यक्ष कृतीतून याचा परिचय दिला.

त्यांना मदत करावी
काझीपेठवरून पायदळ निघालेल्या 25 सदस्य असलेल्या बिऱ्हाडाच्या वेदना बघितल्या. अशा संकटकाळात आम्ही यांच्या जेवणाची व्यवस्था केली. पुढेही त्यांना गोंदियापर्यंत पायी जायचे आहे. अशा परिस्थितीत संवेदनशील लोकांनी   त्यांना मदत करावी एवढी अपेक्षा आहे.
- सूरज माडूरवार, वढोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com