...तर खड्ड्यात मत्स्यपालन करू द्या; बेरोजगारांची प्रशासनाला मागणी

रस्ता दुरुस्त करणे सरकारला शक्य होत नसेल, तर आम्हाला याच खड्ड्यांत मत्स्यपालन करण्याची परवानगी द्यावी
Bad Road
Bad RoadSakal

कोरची (जि. गडचिरोली) : कोरची तालुक्यात रस्त्यावर केवळ खड्डेच पडले नसून हे महाकाय आकाराचे खड्डे आता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे आता हे रस्ते बुजवून रस्ता दुरुस्त करणे सरकारला शक्य होत नसेल, तर आम्हाला याच खड्ड्यांत मत्स्यपालन करण्याची परवानगी द्यावी, अशी उपरोधिक मागणी येथील बेरोजगार युवकांनी केली आहे.

कोरची मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर कोरची-कुरखेडा मार्गावर अंदाजे सहा किलोमीटर अंतराचा वळणी घाट असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. जड व हलक्या वाहनांची या मार्गाने ये-जा होत असताना रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात नेहमी अपघात होत असून हे मार्ग अपघातप्रवण स्थळ बनले आहे. या मार्गाची दयनीय अवस्था पाहून हा मार्ग खरच राष्ट्रीय महामार्ग आहे का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

Bad Road
"शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

काही महिन्यांपूर्वी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यांत पाणी भरून असल्यावर खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. या मार्गावर अनेक लोकांचे अपघात होऊन त्यांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या मार्गावर वळणी घाट असल्यामुळे समोर असलेला खड्डा वाहनचालकांना दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. वळणावर वेळीच मोठमोठे खड्डे दिसून येत नसल्यामुळे चालकांचा तोल बिघडून अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. हा मार्ग त्वरित व्यवस्थितपणे दुरुस्त करून देण्यात यावा, याकरिता कित्येकदा पाठपुरावा करण्यात आला.

परंतु संबंधित विभागाचे अधिकारी गाढ झोपेत असल्यामुळे रस्त्याची आजही अशीच दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीत कित्येक लोकांचे रोजगार गेले असून यामुळे बहुतेक बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. अशात या मार्गात निर्माण झालेल्या खड्ड्यांचे रूपांतर तलावात झाल्यामुळे निदान आम्हा बेरोजगारांना या तलावरूपी खड्ड्यांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी तरी देण्यात यावी अशी मागणी कोरची परिसरातील बेरोजगार युवक करत आहेत.

किती सहन करायचे ?

कोरची हा सरकारच्या दृष्टीने आणि जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनेही अतिशय उपेक्षित, दुर्लक्षित तालुका आहे. अनेक समस्यांची बजबजपुरी येथे माजली असतानाही त्या समस्या सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. येथे रुग्णालयात पाण्याची सुविधा नसते, विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी नेटवर्क शोधत रानात झाडावर बसावे लागते, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कित्येक रात्री अंधारात काढाव्या लागतात, अशा किती समस्या आणि पुढे किती दिवस सहन करायच्या, असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com