
ब्राह्मणवाडा येथे संजय अवथळे यांच्या शेतात रविवारी (ता. 12) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. अवथळे यांच्या शेतात देवीदास उईके हे शेतमजूर कापूस वेचत होते. कापूस वेचता वेचता अचानक त्यांना आपल्या पाठीवर कुठलातरी भार पडल्यासारखे वाटले. त्यामुळे देवीदासने मागे वळून पाहिले. पाहतो तो काय?
मासोद (जि. वर्धा) : शेतात कापूस वेचत असताना शेतमजुराच्या पाठीवर वाघाने थाप मारल्याची घटना घडली. कापसाचे गाठोडे पाठीवर असल्याने वाघाने पंजा मारल्याचे लक्षात आले नाही. नेमके काय घडले म्हणून शेतमजुराने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा अडीच ते तीन वर्षांचा वाघ आढळून आला. जोरदार आरडाओरड आणि दगड भिरकावल्याने वाघोबाने जंगलाकडे पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.
ब्राह्मणवाडा येथे संजय अवथळे यांच्या शेतात रविवारी (ता. 12) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. अवथळे यांच्या शेतात देवीदास उईके हे शेतमजूर कापूस वेचत होते. कापूस वेचता वेचता अचानक त्यांना आपल्या पाठीवर कुठलातरी भार पडल्यासारखे वाटले. त्यामुळे देवीदासने मागे वळून पाहिले. पाहतो तो काय? मागे चक्क वाघाच्या रुपात काळ उभा होता. वाघाने देवीदासच्या पाठीवर असलेल्या कापसाच्या गाठोड्यावर पंजा ठेवल्यामुळे त्याची तेवढीशी तीव्रता जाणवली नाही. मात्र, पाठीवर भार पडल्याचे जाणवल्याने देवीदासने यांनी मागे वळून पाहिले. मागे साक्षात वाघ उभा होता. त्यांनी लगेच जोरात ओरडणे व दगड फिरकावणे सुरू केले. या प्रतिहल्ल्याने वाघाने जंगलाचा रस्ता पकडला.
यानंतर दुपारी चार वाजता दिनेश आसोले यांच्या मालकीच्या वासराची वाघाने शिकार केली. सहायक क्षेत्र अधिकारी डेहनकर, वनमजूर श्रावण काळे, वनरक्षक धामंदे, कोपरे यांनी मौका तपासणी केली. काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, अशीच या घटनेविषयी परिसरात चर्चा आहे. वाघाच्या शेतशिवारातील मुक्त संचाराने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावासभोवतालचा जंगल परिसर बफर झोनमध्ये समाविष्ट आहे. या परिसराला शामाप्रसाद मुखर्जी योजनेत समाविष्ट करण्यात यावे, जेणे करून वनविभागाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळू शकेल, अशी मागणी करण्यात येत आहे.