सातपुडा पर्वतरांगांच्या टेकड्या भूमाफियांच्या घशात; पर्यावरण मंत्रालयाचे दुर्लक्ष

file photo
file photo

सिहोरा (जि. भंडारा) : परिसरात असणाऱ्या सातपुडा पर्वतरांगांच्या टेकट्या भूमाफियांच्या ताब्यात गेल्या आहेत. टेकड्यांच्या लगत अनधिकृत खोदकाम सुरू करण्यात आले आहे. यात मौल्यवान झाडांची कत्तल करण्यात आली असून, कारवाईकडे महसूल आणि वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

सिहोरा परिसरात सोंड्या आणि मुरली गावाच्या शिवारात सातपुडा पर्वतरांगांच्या टेकड्या आहेत. हा परिसर घनदाट जंगलाकरिता प्रसिद्ध असल्याने पर्यटकांना भुरळ घालत आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार आहे. परंतु, या जंगलात मानवाने धुमाकूळ घातला आहे भूमाफियांनी शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.

टेकड्या आणि जंगल परिसर विस्तारित असल्याने वनविभाग कार्यालय बपेरा गावात मंजूर करण्यात आले आहे. हरदोली व बपेरा गावात वनविभागाचे कार्यालय आहे. हरदोली वनविभाग कार्यालयाच्या हद्दीत मुरली गावात अनधिकृत गिट्टी व दगडाचे उत्खनन करण्यात येत आहे. या शिवाय सोंड्या गावाच्या शिवारात असणाऱ्या गट क्रमांक ३६८ मध्ये बेधडक दगड आणि गिट्टीचे खोदकाम करण्यात येत आहे.

झाडांची कत्तल, टेकड्या उद्ध्वस्त

दगड आणि गिट्टी फोडण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्‍यक आहे. यापूर्वी तुमसरच्या कंत्राटदारांना या खाणीचे कंत्राट होते. नंतर त्यांना पर्यावरण विभागाने मंजुरी दिली नाही. यामुळे त्यांनी या खदानमधून ताबा सोडला आहे. त्यांनी ताबा सोडताच अन्य भूमाफियांनी या टेकड्यांचा ताबा घेतला आहे. राजरोसपणे झाडांची कत्तल करीत टेकड्या फोडून दगड काढले जात आहे. शेकडो मजूर या कार्यात असल्याचे दिसून येत आहे.

अवश्य वाचा :  आता नरभक्षी वाघाला ठार माराच, शेतकरी संघटनेची मागणी

महसूल आणि वनविभाग आमने-सामने

दरम्यान, टेकड्यांच्या पायथ्याशी असणारी जागा महसूल विभागाच्या अधिकारक्षेत्रात असल्याची नोंद आहे. मात्र, नुकसान वनविभागाच्या झाडाचे होत आहे. यामुळे भूमाफियांच्या विरोधात कारवाई करताना दोन्ही विभाग आमने-सामने येत आहेत. वनविभागाने कारवाई केली तर महसूल विभागाची आडकाठी येत आहे. यामुळे साटेलोटे करीत हा प्रकार सुरू ठेवण्यात येत आहे.

भूमाफियांच्या विरोधात कारवाई नाही

गाव शिवारात उपलब्ध होणारे दगड आणि गिट्टी स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने या गिट्टीची मागणी वाढली आहे. राजकारणात वजन असणारे व्यक्ती या भूमाफियाचे श्रेणीत आले आहेत. वनविभागाला ही माहिती आहे. त्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू आहे. भूमाफियांच्या विरोधात मात्र कारवाई केली जात नाही.

वनवैभव धोक्‍यात, पर्यटक नाराज

टेकड्यांवरील दगड फोडीचे प्रकार वाढले असल्याने निसर्ग वैभव धोक्‍यात आले आहे. यामुळे पर्यटक नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुरली गावाच्या हद्दीत तर मैदान तयार करण्यात आले आहे. टेकड्या आता हद्दपार होण्याच्या स्थितीत आल्या आहेत. जंगल सोडून वनविभागाचे बिटगार्ड चिरीमिरीकरिता नद्यांचे पात्र पिंजून काढत आहेत. अलीकडे बिट गार्ड आणि ट्रॅक्‍टर मालक यांच्यात वाळूच्या वाहतुकीवरून हमरीतुमरी झाली होती. तक्रारीपर्यंत भांडण प्रकरण गेले होते. नंतर त्यांच्यात दिलजमाई करण्यात आल्याने भांडण निवळले. टेकड्या फोडण्याच्या प्रकारात मोठी कार्यवाही होत नसल्याने भूमाफियांना अभय मिळत आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com