तुमसर (जि. भंडारा) : शहरातील 50 सायकलरिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांवर लॉकडाउनमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. रोजगार हिरावून गेल्याने त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्याची आशा सायकलरिक्षाचालकांना आहे.
तुमसर शहरात जवळपास 50 तीनचाकी रिक्षाचालक असून मागील अनेक वर्षांपासून तुमसर रोड (देव्हाडी रेल्वेस्टेशन) येथून तुमसर शहरापर्यंत रिक्षा चालवीत होते. यातून रिक्षाचालकांना दररोज 400 ते 500 रुपये मिळत होते. परंतु, आता ऑटोरिक्षा आल्याने रिक्षाचालकांना तुमसर शहरातीलच सवारीवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
ऑटोरिक्षा आल्यामुळे सायकलरिक्षांना प्रवाशांकडून विचारले जात नव्हते. यामुळे या रिक्षाचा वापर नुसते सामान वाहून नेण्यासाठी होत आहे. परंतु, काही दिवसांपासून कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सायकलरिक्षाचालकांना सामान वाहून नेण्याचे कामही मिळणे दुरापास्त झाले आहे. आता तर लॉकडाउनमुळे सायकलरिक्षाचालक दररोज फक्त 50 रुपयेच कमवीत आहे; तर काही रिक्षाचालकाला मागील 10 ते 15 दिवसांपासून कोणतेही काम मिळाले नाही. यामुळे संध्याकाळची चूल कशी पेटेल, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
शहरातील सायकलरिक्षाचालकांचे नाव अद्यापही असंघटित कामगारांमध्ये नोंदणी झालेले नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनेनुसार कोणताही लाभ मिळत नाही. असंघटित कामगार म्हणून जर यांची नोंदणी असती; तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळाला असता. लॉकडाउनमुळे अनेक रिक्षाचालकांच्या परिवारातील सदस्य भांडीधुणीसाठी जात आहेत. शासनाने या रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मदत करावी, अशी मागणी होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.