बायपास मार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण

नॅशनल हायवे कधी होणार सतर्क? तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचा आरोप
अपघात
अपघातsakal

देऊळगावराजा - शहराबाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अपघाताचा बायपास ठरला आहे. या बायपास रस्त्यावर आतापर्यंत अनेक भीषण अपघात घडले असून अपघातातील मृत्यूचा आकडा शतका जवळ पोचला आहे. जालना टी पॉइंट ते चिखली मार्गावरील कुंभारी टी पॉइंट पर्यंत पाच किलोमीटर बायपास रस्त्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या घडलेल्या चुका वाढत्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप होत आहे. अनेकांचे बळी घेतलेल्या या मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पर्यायी उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग दखल घेणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यावर जालना टी पॉईंट येथे घडलेल्या दोन भीषण अपघातात पाच प्रवासाचा जागीच मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी झाले. गेल्या अनेक वर्षे भूमी अधिग्रहणाचा वाद असल्याने हा वळण रस्ता अनेक वर्षे रखडला होता. जडवाहने शहराबाहेरून वळविण्यासाठी पूर्णत्वास गेला हा बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर अनेक अपघात घडले. यामधील बहुतांश अपघात भीषण होते. जालना टी पॉईंट, जाफराबाद चौफुली व कुंभारी टी पॉईंट अपघाताचे हॉटस्पॉट ठरले आहे. परिणामी हा धोकादायक रस्ता अपघाताचा बायपास म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असला तरीही आतापर्यंत अपघात रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही हे दुर्दैव. आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही. दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, चौफुली व टी पॉईंट दर्शविणारे दिशादर्शक डीवाईडरचा अभाव असल्याने अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावळण रस्त्याच्या बांधकाम करताना अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड चुका झालेले आहे.

परिणामी अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. वळण रस्ता तयार करताना राहिलेल्या तांत्रिकत्रुटया या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. सदर बायपास मार्गावर कुंभारी परिसरात वळण रस्त्यावर सहा ते सात मीटर खोली करून दुसर्‍या बाजूच्या रस्त्या लेव्हल साठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले त्याचा विरोधाभास म्हणजे जाफराबाद चौफुली ते सातेफळ रस्त्यापर्यंत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला. परिणामी बांधकाम करताना अपघाती वळणासंदर्भात अधिकार्‍यांनी निष्काळजीपणा केला. सदर वळण रस्त्याला अंदाजपत्रकात दुतर्फा नाली बांधकाम असताना दुतर्फा नाली बांधकाम झालेले नाही. रेडियम रिफ्लेक्टर, दिशा, निर्देशक फलक, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, झेब्रा रेडियम पट्टी अशा अनेक त्रुटया राहिले आहे. नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जालना टी पॉईंट व जाफराबाद चौफुलीवर उड्डाणपूल टाकण्यात आले नाही. अनेकांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गालगत येत असल्याने त्यांच्या सोईप्रमाणे रस्ता वळविण्यात आल्याने अपघात घडत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहे. मोठ्या प्रमाणात घडलेल्या भीषण अपघातानंतर नागरिकांमध्ये असंतोष असून दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दोन कंटेनर चे भीषण अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी रात्री साडे दहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग अडविला होता. दरम्यान नॅशनल हायवे विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन अपघात रोखण्यासाठी सर्व तो उपायोजना करण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

देऊळगावराजा शहराबाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता (एन एच ७५३ ए) बांधकाम करताना अनेक तांत्रिक दृष्ट्या हेतुपुरस्सर चुका केल्या आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध या धोकादायक बायपासवर आतापर्यंत झालेल्या अपघाती मृत्यूला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com