आधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे?

file photo
file photo

चंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर तुडतुड्याने हल्ला केला आहे.

२०० ते ३०० हेक्‍टरवरील कापशीच्या क्षेत्रावरही गुलाबीबोंडअळीने आक्रमण केल्याने बळीराजा पुरता खचला आहे. धान कापणीच्या ऐन हंगामात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

जिल्ह्याचे प्रमुख पीक धान आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार १६१ हेक्‍टर क्षेत्रावर धानाचे पीक घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर या तालुक्‍यांचा समावेश आहे. यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. त्यामुळे धान उत्पादकांत उत्साहाचे वातावरण होते. त्यानुसार जिल्ह्यात धानाची रोवणी करण्यात आली. मात्र, मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण तुडतुड्यास पोषक ठरले.

कृषी विभागाच्या उपाययोजना तोकड्या

सावली, नागभीड, चिमूर आणि सिंदेवाहीतील धानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या. त्यानुसार महागड्या फवारणी शेतकऱ्यांनी केल्या. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नसल्याने यंदा उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

गुलाबी बोंडअळीच्या विळख्यात कापूस

जिल्ह्यातील दुसरे पीक कापूस आहे. एक लाख ८३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर यंदा कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कापसाला बोंड आले आहे. राजुरा, कोरपना तालुक्‍यातील जवळपास २०० ते ३०० हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यानुसार कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या जनजागृतीचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पिके वाचविण्यासाठी धडपड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाले होते. अशा संकटात शेतकऱ्यांनी पैसे जमवून शेती केली. त्यांच्या साथीला पाऊस धावून आला. जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिके चांगली जमून आली. मात्र, मधल्या काळात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com