कोरोनाच्या सावटाखाली खरीप हंगाम भीषण संकटात

khar
khar

मूर्तिजापूर (जि. अकोला) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतीचा खरीप हंगाम धोक्यात आला असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकण्याची भीती निर्माण झाली आहे. अख्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने आरोग्यासह अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यापैकी कृषी आधारीत अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशातील कृषीव्यवस्था मोडकळीस आली आहे. तालुक्यात सुमारे ७२ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखालील शेत जमिनींचे आहे. बहुतांश शेती कोरडवाहू म्हणजे खरिपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारी आहे. आधीच वीज आणि पाण्याअभावी हैराण झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर कोरोनाने मोठे संकट उभे केले आहे. रब्बी हंगामातील कृषीउपज संचारबंदीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व्यर्थ ठरत आहे.

आर्थिक संकटामुळे कंबरडे मोडले
पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपला असून, पेरणीपूर्व मशागत लॉकडाउन असल्याने मजुरांअभावी खोळंबली आहे. डिझेल अभावी ट्रॕक्टर थांबल्याने नागरणी, वखरणीच्या कामांना खीळ बसली आहे. ४० ते ५० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. कापूस खरेदी केंद्रच तालुक्यात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सीसीआयच्या अन्य केंद्रावरून या तालुक्यातील शेतकरी परत पाठविला जात आहे. नॉन एफएक्यू कापूस खरेदीच केला जात नाही. कासोटीला पैसा नसेल, तर शेतकरी बियाणे, खते, जंतुनाशके कसा खरेदी करेल ? असे असंख्य प्रश्न विचारणारा शेतकरी हतबल आहे.

मदतीची करत आहेत अपेक्षा
अशा स्थितीत केवळ कृषीक्षेत्र लॉकडाउनच्या निर्बंधांमधून मोकळे असल्याचे शासनाने सांगून चालणार नाही. शेती, शेतकरी व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल आणि भविष्यातील संभाव्य उपासमार थांबवायची असेल, तर शासनाने शेतकऱ्यांना मजुरांसहीत प्रत्यक्ष भारीव मदत करण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. पेरण्या सुरू होण्यापूर्वी व होताच बियाणे, खातांसाठी उडणारी झुंबड थांबवण्यासाठी आजच साठेबाजी न होण्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारची कारखानदारी लॉकडाउन दरम्यान सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

काम करण्याची मानसिकता पाहिजे
मागणीनुसार एमआरईजीएस (रोजगार हमी) ची कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. ग्रामपंचायत स्तरावर काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. या कायद्यातच काम देण्याची तरतूद आहे. लोकांची काम करण्याची मानसिकता आसणे गरजेचे आहे.
-अभयसिंह मोहिते, उपजिल्हाधिकारी, मूर्तिजापूर.

सर्वच कामे रोहयोतून होणे आवश्यक
शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. मूर्तिजापूर सरख्या शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवावर्ग वास्तव्यास आला आहे. आणि शहरातच रोहयोची कामे नाहीत. हा दैवदुर्विलास आहे. पेरणीपूर्व मशागतच नव्हे, तर पेरणी ते कापणी अशी सर्वच कामे रोहयोतून होणे आवश्यक आहे.
-प्रकाश बोनगिरे, शेतीप्रश्नांचे अभ्यासक, शेतकरी नेते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com