मेरे शहर को किसकी नजर लग गयी? का आली कामठीला अवकळा? 

Large industries closed in Kamathi city
Large industries closed in Kamathi city

कामठी (जि. नागपूर) ः एखाद्या शहरातील उद्योगधंदे, औद्योगिक प्रकल्प खरेतर त्या शहराचे वैभव असते. कारण याच उद्योगांमुळे त्या शहरातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळतो, परिणामी आर्थिक सुबत्ता येते. पण एखाद्या शहरातील एक, दोन नव्हे तर बरेच उद्योग बंद पडले असतील तर काय वाटत असेल तेथील स्थानिकांना? अशीच स्थिती आहे कामठीची. राज्याच्या उपराजधानीतील सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून एकेकाळी कामठीचा नावलौकिक होता. नागपूरचा उल्लेख निघाल्यानंतर कामठीचे नाव येणार नाही तर गोष्टच गेली. 

बहुसंख्येने असलेल्या विणकरांच्या घराघरांत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हातमागावर कापड तयार करण्याचे काम चाले. सर्वत्र आर्थिक संपन्नता होती. परंतु आता खाण्याचे वाके झाले. ज्यांना शक्य होते त्यांनी गाव सोडले, पर आम्ही रोजमजुरीचे काम करून जगतो. मागचे दिवस आठवले की लई वाईट वाटते, ६५ वर्षीय दीनानाथ यांच्या या एकाच वाक्याने कानात गरम शिसे ओतल्यासारखे झाले. दीनानाथ यांच्यासारखे शेकडो लोक आज रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. याला खरेच देशाची प्रगती म्हणता येईल का?

-बाबू अच्छेलाल

सिमेंटच्या नाल्यांवर लाखोंचा खर्च, नागरिकांना कुडाची घरे; वाचा ग्रामीण भागातील विरोधाभास
 
नागपूर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या कामठीत मौद्याहून उशिरा रात्री पोहोचलो. पहाटे पहाटेच उठलो तयारी केली तेवढ्यात सकाळचे कामठी तालुका बातमीदार सतीश दहाट पोहोचले. कामठी शहराचा फेरफटका मारायला त्यांच्यासोबत निघालो. कामठी शहरातील स्थित्यंंतरे ते सांगू लागले. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणा किंवा स्थानिकांचे दुटप्पी धोरण यामुळे कामठी शहराचे जुने वैभव लोप पावले आहे.
 
येथे मोठ्या प्रमाणात असलेले उद्योगधंदे बंद पडले. विणकर व बिडी कामगार मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. एक काळ असा होता की पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत बहुतांश घरांतून खट-खट असा आवाज यायचा. शहरात मोठ्या संख्येने असलेल्या हातमाग विणकरांच्या कापडाला राज्यच नव्हे तर देशभरातून मोठी मागणी होती. यासोबतीला बिडी व्यवसायही जोरात सुरू होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कामात गुंतलेला असे. प्रत्येकाच्या हाताला काम होते. रोजगाराची साधने कमी असल्याने या उद्योगांवर जीवापाड प्रेम होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. काही विणकर, बिडी कामगारांची मुले उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचली. ‘हमारे याहासे केवल नागपूर ही नही मध्यप्रदेश, छत्तीसगड में कपडा जाता था. लेकीन अब कामही नही. इतनी महंगाई मे चार जन का पेट कैसे भरेंगे?’ पंचावन्न वर्षीय रोशन बी यांच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. हाताला काम नसलेले अनेक जण दिवसभरात भेटले.

आमचे दिसं गेले, हमारे बालबच्चो का क्या होगा?

जुल्फेकार अली भेटले. त्यांनी त्यांची आपबिती सांगितली. परंपरागत उद्योग बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात भटकंती सुरू झाली. गावात काम नसल्याने दुसऱ्या गावाच्या सीमेवर झोपड्या टाकून, राहुटी मांडून मिळेल ते काम करू लागलो. कामठी शहरालगतही श्रमिकांच्या झोपड्या वसल्या. हातचा परंपरागत व्यवसाय गेल्याने शहरात मोठ्या संख्येने मजूरवर्ग निर्माण झाला. रस्त्यावर आलेल्या मजुरांना त्यावेळी कळमना येथे नव्याने सुरू झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलासा दिला. येथे मोठ्या संख्येने मजुरांना काम मिळाले व आजही मिळत आहे. अन्यथा मजूर कॅम्प असलेले हे मोठे शहर ओस पडले असते. आजही बराच मोठा मजूरवर्ग कामठीतून मोठ्या संख्येने कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जातो. मिळेल ते काम करून स्वतःचे व कुटुंबाचे पालणपोषण करतो. गेल्या २० वर्षांपासून तेच सुरू असल्याचे जुल्फेकार अली सांगतात. आमचे दिवस तर कसेतरी गेले, पण वाढत्या महागाईत मुलं आपले पोट कसं भरतीन, याचाच विचार येते जी, अशी कैफियतही जुल्फेकार अली यांनी मांडली.

बदलांमध्ये सरकारी बघ्याची भूमिका

शासनाच्या उदासीन धोरणामुळे कापडासाठी लागणारा कच्चा माल, धागे मिळण्यास दिरंगाई होऊ लागली. सततच्या निष्काळजीपणामुळे कंटाळून हातघाईस आलेला मजूरवर्ग आंदोलनातून शासनाच्या विरोधात पेटून उठला. धाग्याचा व्यापार करणारे व्यापारांच्या गोडावूनमध्ये घुसून धाग्याची लुटमार करू लागले. पर्यायी व्यवस्था नसल्याने यावर तोडगा काढण्यापेक्षा बघ्याची भूमिकाच शासनाने घेतली. घरीच काम करणाऱ्या महिला मग कामाच्या शोधात घराबाहेर पडल्या. शिवणकाम, एम्ब्रॉयडरी आदी काम करू लागल्या. पुरुषांनी सायकल, मोटारसायकल, कार दुरुस्ती, फेब्रीकेशन वर्क, गॅस व शेगडी दुरुस्ती, वाहनाांची पेन्टिंग अशी कामे स्वीकारली. कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी स्वतःला झोकून देऊन कुटुंबाला आधार दिला. २० वर्षांपूर्वी कामठीत सात हजारांवर विणकर कामगार होते. परंतु कलाकुसरीच्या हातांमध्ये आता फावडे, कुदळ आले.
 

एमआयडीसीही पडल्या ओस

कामठीत लोहा मिल म्हणून प्रसिद्ध असलेल्या दी नागपूर री रोलिंग मिलचे नाव जिल्ह्यासह सर्वदूर होते. महत्त्वाचे म्हणजे, नागपूर जिल्ह्यात मोठ्या एमआयडीसी स्थापन झाल्या असल्या तरी त्या काळात जिल्ह्यात एकमेव री रोलिंग मिल पहिलीच होती. ती कालांतराने बंद पडली. ५०० च्या वर असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावला गेला. याशिवाय कामठीत दोन टाइल्स कंपन्या नॅशनल व नॅशनल टाइल्स रेल्वे लाईनच्या पलीकडे होत्या. या कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या टाइल्स बाजारात व काही राज्यात पाठवल्या जायच्या. दोन्ही कारखान्यात ४०० च्या वर महिला व पुरुष कामगार होते. कालांतराने आलेल्या स्पर्धेच्या युगाात त्यांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही.
 

चिमणीही गेली अन् भोंगाही

औद्योगिक क्षेत्रात त्यावेळच्या गोंडवाना पेेंट कारखान्यात २५० मजूर होते. या उद्योगातील उत्पादन गोंडवाना पेंन्टस नावाने सुरू होते. या उद्योगाची वाट लागली व कामगारांवर उपासमारीची वेळ आली. आजही गोंडवाना पेंट्स कंपनीच्या जागेवर १२५ फूट उंच आगीची चिमणी आहे. पूर्वी या चिमणीतून भोंगा वाजायचा. त्यावेळी बहुतेकांना वेळेसाठी घड्याळ पाहण्याची गरज भासत नसे. कारण सायरनच्या आवाजाने वेळ कळायची. त्यानुसार लोक दिनचर्या ठरवायचे. नंतरच्या काळात गोंडवाना पेंट येथे शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याचा हस्तकला व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मोठा प्रकल्प सुरू केला. दुसरे काम करण्यासाठी शिक्षणही नसल्याने अनेकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. अशाप्रकारे चिमणीही गेली अन् भोंगाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com