Video : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार!; समिक्षा समिती गठित करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात दारूबंदीच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच सदस्यीय गठित करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजप सरकारने एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. गावागावांत अवैध दारूविक्री सुरू आहे. कोट्यवधींची दारू जप्त करण्यात आली. हजारो दारूतस्करांना अटक करण्यात आली. त्यामुळे दारूबंदी फसवी निघाल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा विषय केंद्रस्थानी होता. कॉंगेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठेल, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागली होती.
उघडून तर बघा - वऱ्हांड्यात जेवण केल्यानंतर तेथेच झोपी गेल्या मग निघाला विळा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्या आणि महाआघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे चंद्रपूरची दारूबंदी हटेल, अशा चर्चांनी पुन्हा जोर धरला. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे कोटींचा महसूल बुडत असल्याचा विषयावर चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे समाजमाध्यमावर चर्चा रंगू लागली.
चर्चांना पुन्हा बळ
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठित केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे समाजमाध्यमांवर रंगू लागलेल्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले. यानंतर नुकतीच जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दारूबंदीच्या अभ्यासासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच समितीचे गठण केले जाणार आहे.
समिती गठनाची तयारी सुरू
पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात प्रथम आगमन केल्यावर घेतलेल्या पत्रपरिषदेत दारूबंदीची समीक्षा करावी, यासाठी समिती नेमण्यात यावी, अशी भूमिका मांडली. यानंतर या विधानाचे राजकीय-सामाजिक तरंग उठले होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना अशी समिक्षा समिती गठित करण्याबाबत तोंडी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने समिती गठनाची तयारी सुरू केली आहे. समितीत शासकीय आणि अशासकीय सदस्य असतील. दारूबंदीनंतर जिल्ह्यात झालेल्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक आणि गुन्हेगारी विषयक बदलांचा अभ्यास-आढावा ही समिती करेल अशी अपेक्षा आहे.
- डॉ. कुणाल खेमणार,
जिल्हाधिकारी, चंद्रपूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.