भरभरून पिकलाय संत्रा; शेतक-यांचे खिसे मात्र रिकामेच

orange
orange

वरुड (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या वरुड-मोर्शी तालुक्‍यात संत्राउत्पादक शेतकरी बहुसंख्येने आहेत. संत्र्याला योग्य भाव मिळाल्यास या भागात कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादकांना उत्पादनखर्च काढणे कठीण झाले आहे. भाव मिळत नसल्याने संत्रा बेभाव विकावा लागत असल्याची खंत उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
नोटबंदी आल्यानंतर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतांनाच आता कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाची व पर्यायाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची वाताहत झाली. लॉकडाऊनमुळे संत्रा विकत घेण्यासाठी व्यापारी बागांकडे फिरकत नसल्याने मिळेल त्या भावात संत्रा विकावा लागत आहे. परिणामी कोट्यवधींचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. संत्रा उत्पादक शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत करावी व विशेष आर्थिक पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी आता संत्राउत्पादक शेतकरी करू लागला आहे.
जिल्ह्यात संत्र्याचे 70 हजार हेक्‍टर क्षेत्र असून वरुड-मोर्शी तालुक्‍यात 35 हजार हेक्‍टरवर संत्र्याचे पीक घेतले जाते. संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्‍यात संत्रा लागवडीखाली 21 हजार हेक्‍टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे 17,671 हेक्‍टरवर आहेत. परिसरात 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती, त्यातच आलेल्या नोटबंदीमुळे संत्राउत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसला. तीच परिस्थिती आताही संत्राउत्पादक शेतकऱ्यांवर आली. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शेती व्यवसायही प्रभावित झाला. तालुक्‍यातील संत्राउत्पादक शेतकऱ्याला यावर्षी संत्रा उत्पादनापासून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या फोल ठरल्या. शासनाने मदत करावी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळत असताना अधिक भावाच्या अपेक्षेने संत्राविक्री केली नाही. मात्र अचानक शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन केले. त्यामुळे शेतमालाची वाहतूक बंद झाली व व्यापारी फिरकेनासे झाले. परिणामी शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या व कवडीमोल भावाने संत्रा विकावा लागला. सुरुवातीला संत्र्याला 15 ते 25 हजार रुपये टन इतका बाजारभाव होता. मात्र लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांना संत्रा विकण्यासाठी व्यापाऱ्यांची मिनतवारी करण्याची वेळ आली.

कोरोनामुळे संत्रा-अर्थकारणावर परिणाम झाला. संत्राखरेदीकरिता व्यापारीच येत नसल्याने बाजारभाव पडलेत. यात खूप मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. त्यामुळे शासनाने संत्राउत्पादकांना आर्थिक मदत करावी व पीकविम्याची रक्कम सरसकट द्यावी.
 सौरभ मानकर, संत्राउत्पादक शेतकरी

शेतकरी हवालदिल
लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी संत्राखरेदी बंद केली आहे. परिणामी मिळेल त्या किमतीत संत्रा विकावा लागला. यात शेतकऱ्यांचे अर्ध्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याला जगविण्यासाठी मदत करण्याची गरज आहे.
डॉ. अमोल कोहळे, संत्राउत्पादक शेतकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com