आठ लोकांचा जीव घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा - खासदार धानोरकर

MP balu dhanorkar demand to killed tiger in chandrapur
MP balu dhanorkar demand to killed tiger in chandrapur

चंद्रपूर : राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या २२ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना या वाघाने ठार केले, तर अनेकांना गंभीर जखमी केले. शेतकऱ्यांची जनावरेही वाघाने फस्त केली. वनविभाग पथके तयार करून वाघाचा शोध घेत आहे. मात्र, अजूनही वाघ तावडीत सापडला नाही. आता या नरभक्षी वाघाला गोळ्या झाडून ठार मारावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे. 

राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात मागील २२ महिन्यांपासून नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. त्याने आठ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेतला, तर तीन शेतकऱ्यांना जखमी केले. त्यानंतर वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. दीडशेच्या आसपास कॅमेरे या वनपरिक्षेत्रात लावले. वनकर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र वाघाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. जवळपास २१ गावे या वनपरिक्षेत्रात येतात. या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेले आहेत. जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपासून वनविभागाने पथके तयार केली. मात्र, वनविभागाच्या तावडीत वाघ काही सापडला नाही. 

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत वनविभागाला सपशेल अपयश आले आहे. शनिवारी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राजुरा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघाने आजवर घेतलेल्या बळीची माहिती दिली. या वाघाला गोळ्या झाडा, अशी मागणी त्यांनी चर्चेत केली. यावेळी ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक कमिटीचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती. 

आजी, माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र -
राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या वाघाला ठार मारावे, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार निमकर, माजी आमदार संजय धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्या - 
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांतील वारसदारांना व्याघ्रग्रस्त म्हणून वनविभागात नोकरी देण्यात यावी. शासकीय मदत १५ लाखांवरून २५ लाख करण्यात यावी. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावे. जंगलालगत शेतीला तारेचे कुंपण करण्यात यावे. वन्यजीवमार्फत झालेल्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार निमकर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com