काही जखमा अजूनही न भरलेल्या युगमुळे आठवणी झाल्या ताज्या 

काही जखमा अजूनही न भरलेल्या युगमुळे आठवणी झाल्या ताज्या 

नागपूर - युग चांडक प्रकरणातील विधिसंघर्षग्रस्त बालकावरील सुनावणीमुळे पुन्हा एकदा नागपूरकरांच्या मनात असलेली पाल्यांविषयीची चिंतायुक्त काळजीची भावना दाटून आली आहे. सर्वसामान्यांच्या मनात भावनांची घालमेल सुरू असतानाच ज्या कुटुंबीयांवर पाल्याच्या वियोगाचे संकट ओढवले, त्यांच्या जुन्या जखमा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. युगप्रमाणेच घडलेल्या त्या घटनांच्या आठवणीने पालकांचे हृदय द्रवले असून हृदयाच्या कप्प्यात अनेक वर्षांपासून असलेली जुनी जखम भळभळून वाहू लागली आहे. 

आदित्य पारेख, हरेकृष्ण हसमुख ठकराल आणि अलीकडच्या काळातील कुश कटारिया. या घटना नागपूरकरांच्या मनावर पार कोरल्या गेल्या आहेत. यावरून त्यांचे पालक व नातेवाइकांच्या दुःखाची कल्पना करता येऊ शकते. आदित्य आणि हरेकृष्णच्या घटना 14 वर्षांपूर्वीच्या. आदित्य गेला तो अद्याप परत आला नाही. पोलिसांना त्यावेळी सुगावा लागला होता. पण आरोपींनी पोलिसांना चकमा देत लोकेशन बदलले. ते लोकेशन आजपर्यंत गवसले नाही आणि त्याच्यासह अपहरणकर्त्यांचा पत्ता लागला नाही. हरेकृष्ण प्रकरणात पोलिसांना अपहरणकर्त्यांचे धागेदोरे मिळाले. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात बराच उशीर झाला होता. अखेर ठकराल दाम्पत्याला दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. या घटना जणू आजच घडल्याप्रमाणे त्यांचा घटनाक्रम डोळ्यासमोरून जातो. आजही मुले परत येतील, अशी आशा त्यांच्या पालकांच्या डोळ्यात दिसून येते, असे या कुटुंबीयांशी संबंधित एका व्यापाऱ्याने सांगितले. 

प्रसंगावधानाने "ती' परतली 
हरेकृष्णच्या घटनेनंतर अनेक प्रकरणांच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यातच आल्या नाहीत, अशी त्यावेळी चर्चा होती. अशाच एका घटनेत पारडी भागातील रेल्वे क्रॉसिंगवर सकाळी एका डॉक्‍टरच्या कन्येचे शाळेत जाताना अपहरण झाले. तत्कालीन पोलिस उपायुक्त संजयकुमार आणि कुलवंत कुमार यांना वायरलेसवर या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंट्रोलरूम व घटनास्थळाचा मोर्चा सांभाळला. वेगाने चक्रे फिरवून जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याने नरखेडजवळ ही मुलगी सुखरूप मिळाली. त्यावेळी आयएमएतर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. प्रसंगावधाने "ती' परतली. मात्र, आदित्य, हरेकृष्ण यांच्याप्रमाणे काही नोंद न झालेल्या अनेकांचा आजही पत्ता लागलेला नाही. 

काय म्हणते आकडेवारी? 
मुंबई व महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशातच मुलांचे अपहरण होण्याचे वा मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण कितीतरी वाढले आहे. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2008 ते 2010 या काळात देशातील 392 जिल्ह्यांतून एक लाख सात हजार मुले बेपत्ता झाली. त्यापैकी सुमारे 42 हजार मुलांचा शोध लागलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुले बेपत्ता होऊन आणि त्यापैकी सुमारे 45 टक्के मुलांचा शोध लागत नाही, ही गंभीर बाब असूनही तिची राष्ट्रीय पातळीवर फारशी दखल घेतली जात नाही, ही आश्‍चर्याची बाब आहे. मुख्य म्हणजे, भारतात दरवर्षी सुमारे एक लाख मुले गायब होतात. यातील 40 हजार मुलांचा कधीच शोध लागत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com