नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) बारावीच्या निकालाची शुक्रवारी (ता.१२) संकेतस्थळावर घोषणा करण्यात आली. यावेळी बारावीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविडमुळे दहावीची २०२१ सालची परीक्षा रद्द करण्यात आली होती. ‘कोविड बॅच’ असलेल्या या विद्यार्थ्यांना सर्वतः ऑनलाइन शिक्षणातून जावे लागल्याचा परिणाम यंदाच्या बारावीच्या निकालावर दिसून आला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात ५.३८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.
बारावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली. यावर्षी देशभरातून १६ लाखावर विद्यार्थी ६ हजार ७३९ केंद्रावर परीक्षेला बसले. याशिवाय नागपुरातून दोन हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देशातून १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ८७.३३ इतकी त्याची टक्केवारी होती. मात्र, गेल्यावर्षी बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७१ इतकी होती. त्यामुळे यंदाच्या निकालात ५.३८ टक्क्यांची घट दिसून आली.
निकालात त्रिवेंद्रम बोर्डाचा निकाल सर्वाधिक ९९.९० टक्के तर सर्वात कमी निकाल नोयडा बोर्डाचा ८०.३६ टक्के लागला. पुणे बोर्डाचा निकाल ८७.२८ टक्के लागला. दोन वर्षांपूर्वी २०१९-२० मध्ये देशासह जगात कोरानाची लाट आली. त्यामुळे संपूर्ण शिक्षण बंद पडले.
मात्र, सीबीएसई शाळांनी ऑनलाइन शिक्षणाची साथ घेत विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. मात्र, शिक्षण सुरू राहीले तरी कोविडच्या धसक्याने कोणत्याच बोर्डाद्वारे परीक्षा घेण्याचे टाळले. त्यातूनच २०२०-२१ या कालावधीत केवळ ‘ॲव्हरेज’ मार्काचा आधार घेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाच्या विद्यार्थ्यांनी थेट नववीनंतर बारावीतच परीक्षा दिल्याचे आढळून आले. त्यातूनच यंदाचा बारावीचा निकाल सर्वत्र घटल्याचे चित्र दिसून येत आहे.
बोर्डाच्या परीक्षेचा सराव झालाच नाही
सीबीएसई बोर्डाद्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन केल्या जाते. दहावीच्या परीक्षांचा सराव झाल्यावर विद्यार्थ्यांच्या डोक्यातून बारावीच्या परीक्षांची भिती निघून जाते. मात्र, यावर्षी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट नववीनंतर बारावीची परीक्षा दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ‘कॉम्पीटन्सी बेस’ प्रश्न परीक्षेत आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत आलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर ‘टफ’ गेल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा निकालात घट झाल्याचे दिसून आले आहे.
दहावीचा निकालही घटला
सीबीएसई बारावीप्रमाणे दहावीच्याही निकालात यंदा १.२८ टक्क्यांनी घटला आहे. गेल्यावर्षी ९४.४० टक्क्यावरचा निकाल यावर्षी ९३.१२ टक्क्यावर आला. राज्यात १५ मे ते २१ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये देशातून २१ लाख ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २० लाख १६ हजारावर विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. नागपुरातून सात हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पुणे बोर्डाचा निकाल ९६.६२ टक्के लागला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.