
पारशिवनी (जि.नागपूर) : घनदाट अरण्यातून 45 किलोमीटरच्या अंतराची पायपीट करीत पोटाची भूक भागविण्याकरिता सोमवारी पायवाटेने पारशिवनी शहरात येऊन किराणा सामान तसेच गरजेच्या वस्तू खरेदी करणे, रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र भटकून परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी धडपड करणे, कोरोनाच्या काळात मध्य प्रदेशच्या गावात ग्रामस्थांना जाण्यास मनाई, दळणाची चक्की मध्य प्रदेशाच्या हद्दीत, तेही दळण देण्यास मनाई, अशा परिस्थितात असलेले मध्य प्रदेश व महाराष्ट्रच्या सीमेवर वसलेले 152 आदिवासींचे 52 घरांचे गाव घाटकुकडा सध्या देशाच्या नकाशावर आहे की नाही, कोण जाने ! तरीही समस्यांशी दोन हात करत हे आदिवासीबांधव आजही जगत आहेत.
आदिवासींच्या अस्तित्वाची दखलच काय
आजारी पडलेला माणूस तो पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात येईस्तोवर जिवंत राहील की नाही, याची अजिबात शाश्वती नाही. रस्ता असून नसल्यासारखा.. शाळा तिही वर्ग चारपर्यंतच, नंतर काय? रोजगाराच्या नावानं चांगभलं...आरोग्याची देखभाल करण्यासाठी फक्त अंगणवाडीसेविका, बाळंतपण होणार अशा परिस्थितीत धावाधाव करते. प्राथमिक आरोग्य केंद्र कोसो दूर...वाहन शोधूनही मिळणार नाही. मिळाले तर जंगलदऱ्यातून कच्च्या वाटेने प्रवास. 28 घरी वीज पोहोचली, उर्वरित आदिवासी अंधाराच्या सोबतीने दिवस कंठतात. आर्थिक चणचण सदैव सोबतीला...आधुनिक युगातील मागासलेले गाव असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
गावात नाही चक्की किंवा वाहन
छोट्याछोट्या झोपडीत कसाबसा संसार थाटलेला. या गावात साधे किराणा दुकान नसणे, गावात चक्की, वाहन, आरोग्य सुविधा आजही नसल्याने या ग्रामस्थांचे जगणे तरी कसे असावे, याची कल्पना न केलेली बरी. येता-जाता हिंस्रपशूंपासून जीवाला धोका. रोजगार मिळाला तर परिवाराचे पालनपोषण कसे करावे? हा प्रश्न. मुलाच्या शिक्षणाचे तर नावच सोडा! अशा एक ना अनेक समस्या एकापाठोपाठ तयार असतात. शेतीशिवाय दुसरे काम नाही. अशाही बिकट परिस्थितीत येथील आदिवासी आपले व परिवाराचे पालनपोषण कसे करत असतील, हा प्रश्न आहे.
या समस्यांवर विचार व्हावा !
येथील आमदार, खासदार निवडणुका आल्या की एकदा तरी त्यांच्या दारापर्यंत मतदान मागायला जातात. नंतर मात्र "मी कुठला नी तू कुठला' अशी स्थिती. या ठिकाणची परिस्थिती पाहता शासनाने आरोग्याच्या पुरेपूर सुविधा त्यांच्या गावी उभी करणे गरजेचे आहे. दहावीपर्यंत शिक्षणाची सोय करून देणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाने एक दोन फेऱ्या प्रवासाकरिता उपलब्ध करून द्याव्या. रस्त्यासाठी वनविभागाशी चर्चा करून प्रश्न सोडविता येऊ शकतो. शक्यतो शेतीशिवाय येथे रोजगाराच्या सोई उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाची असल्याने येथे रोजगारासाठी उद्योग निर्माण करून परिसरात रोजगारनिर्मिती करून द्यावी. ही कामे येथील लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन करून दिल्यास येथील जीवन मरणाचा तसेच पोटापाण्याच्या नी रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा तर विकसनशील महाराष्ट्रातील घाटकुकडा या गावाला आधुनिक जगाशी जोडता येऊ शकेल. अन्यथा आपण कितीही आधुनिकतेकडे वाटचाल केली तरी ती अपुरी राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.