नागपूर : मध्यरात्र उलटलेली असते, शेवटच्या घटका मोजत असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयाची रुग्णवाहिका मेडिकलमध्ये घेऊन येते. प्रकृती गंभीर असल्याने सारे मेडिकलचे कॅज्युल्टीतील डॉक्टर त्याला दाखल करून घेतात, मात्र २४, ३६, ७२ तासात त्या रुग्णांचा मृत्यू होतो. काही रुग्णांचा जीव वाचतोही...दर दिवशी शहरातील नावाजलेल्या खासगी रुग्णालयांतून मृत्यूच्या दारातील रुग्णांना मेडिकल-मेयोत रेफर करतात. खासगीत होणाऱ्या मृत्यूची नोंद मेडिकलमध्ये होते. तर मेडिकलमध्ये आणल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक सहज करतात. मेडिकलमधून ‘डेथ सर्टिफिकेट'' नातेवाइकांना मिळते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) असो की, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. मेयो- मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात दरवर्षी बारा लाखांवर रुग्णांची नोंद नोंद होते. या दोन रुग्णालयांच्या भरवशावरच अनेक खासगी हॉस्पिटल सुरू आहेत. रात्री ज्याप्रमाणे मृत्यूच्या दारातील रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात येते. त्याचप्रमाणे गावखेड्यातून रुग्ण नागपुरात मेयो, मेडिकलमध्ये उपचारासाठी आला की, प्रवेशद्वारावरच त्या रुग्णांना पळविण्याचे काम येथील दलालांमार्फत होते. रुग्णाच्या खिशात पैसे असेपर्यंत किंवा मृत्यूच्या दारात जाईपर्यंत खासगी रुग्णालयात उपचार होतात. पैसै संपले किंवा पुढे काही तासात रुग्णाचा मृत्यू होणार ही बाब लक्षात येताच खासगी रुग्णालयातून रुग्णांना मेडिकल-मेयोत रेफर केले जाते.
खासगी रुग्णालयांकडून अंतिमक्षणी ‘रेफर’
रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्यानंतर त्याच्या मरणाची सोय मेयो-मेडिकलमध्ये करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून करण्यात येते.
वाढतोय मृत्यूचा टक्का
मेयो,मेडिकलमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना मेडिकल, मेयोत समाधानकारक उपचार मिळत नसल्याचे कारण सांगून, रक्ताच्या तपासण्या होत नाही, डॉक्टर नाहीत,अशी कारणे सांगून रुग्ण पळवले जातात. दलालांमार्फत खासगी रुग्णालयात रुग्ण पोचताच पोहचवणाऱ्याचे ‘कमिशन'' मिळते. रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार सुरु होतात. रुग्णाजवळचे पैसे संपल्यानंतर मात्र शहरातील अनेक खासगी रुग्णालये पुन्हा मेडिकलमध्ये रेफर करतात. रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांच्या लक्षात येते. याशिवाय योग्य उपचार न झाल्याने किंवा गंभीर आजारामुळे रुग्ण अखेरच्या घटका मोजत असतो. यामुळे खासगी रुग्णालयांत मृत्यूची नोंद होत नाही आणि मेडिकल-मेयोत मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
मेडिकलमध्ये दर दिवसाला शहरातील, विदर्भातील नव्हेतर मध्य भारतातून रुग्णांना रेफर करण्यात येते. रुग्ण आधी खासगी रुग्णालयात उपचार घेतात, नंतर मृत्यूच्या दारात असताना मेडिकलमध्ये येतात. गरिबांसाठी हे रुग्णालय असल्याने येथे उपचार करण्यासाठी डॉक्टर सदैव तयार असतात.
-डॉ.अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल
मेडिकल : वर्षभरात ६ हजार ३७८ मृत्यू
मेयो : वर्षभरात ४ हजार ७०० मृत्यू
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.