
Nagpur News: चित्रपटांच्या शुटिंगसाठी नागपूर ‘बेस्ट’
Nagpur News : नागपुरातील ‘झुंड’च्या शुटींगदरम्यानच्या खूप आठवणी आहेत. येथील लोकांनी खूप मदत केली. लोकांच्या घरात शुटिंग केले, स्वयंस्फूर्तीने त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचीही खूप मदत झाली. एकूणच चित्रपटांच्या शुटिंगसाठी नागपूर उपयुक्त व चांगले शहर असल्याचे दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते नागराज मंजुळे यांनी गुरुवारी नमूद केले.
रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये ‘घर बंदूक बिर्याणी’ या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता माध्यमांसोबत बोलत होते. त्यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सयाली पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी नागपुरातील झुंड व नाळ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.(Latest Marathi News)
यापूर्वी शुटिंगसाठी नागपूरला येण्याचे टाळले जात होते. नागपूर जणू उत्तरप्रदेश, बिहारमध्ये आहे की काय, असा समज होता. परंतु ‘नाळ’ चित्रपटाची पूर्ण शुटिंग नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर केली. (Latest Nagpur News)
लोकांनी खूप मदत केली. ‘झुंड’साठी अनेक दिवस अमिताभ बच्चन यांच्यासह होतो. येथील नागरिकांनी मोठे सहकार्य केले. या भागात शुटिंगसाठी उपयुक्त ठिकाणेही आहेत. त्यामुळे नागपूर शुटिगंसाठी ‘बेस्ट’ आहे, असे ते म्हणाले.
‘ऑस्कर’ जिंकण्यापेक्षा जागतिक पातळीवर चांगले काम करण्याचे महत्त्व आहे. ऑस्कर मिळाला तर ठिक, नाही मिळाला तरी ठिक, माझ्यासाठी रसिकांचे प्रेम महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
पुढे आणखी एक हिंदी चित्रपट घेऊन येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. अभिनय करण्यापेक्षा दिग्दर्शनच पहिले प्रेम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दक्षिणेत दिग्दर्शकाला महत्त्व सयाजी शिंदे
दक्षिणेत अनेक चित्रपटात काम केले. अभिनय वगैरे सर्वच भाषेत सारखाच असतो. परंतु दक्षिणेत दिग्दर्शकाला खूप महत्त्व आहे. त्यांच्या पाठीमागे निर्माते खंबीरपणे उभे असतात.
पैसा असेल तर चित्रपटही छान तयार होतात, हे भान निर्मात्यांनी ठेवायले हवे, असे अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.