
शिक्षणतज्ज्ञांनो, भविष्याचा विचार करा
नागपूर : सुदृढ देशाच्या निर्माणासाठी येणाऱ्या शंभर वर्षाचा विचार करावा लागणार आहे. हा विचार मूल्याधिष्ठित शिक्षण, अर्थकारण आणि वातावरणाबाबत करणे गरजेचे असून शिक्षणतज्ज्ञांची यात महत्त्वाची भूमिका आहे. तेव्हा शिक्षणतज्ज्ञांनी भविष्याचा वेध घेऊन विचार करावा असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशनच्या वतीने विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंटचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुल कानेटकर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात येणाऱ्या २५ वर्षांचा विचार करण्यात आला आहे. हे धोरण शिक्षण, समाज आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र, त्याला प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी शिक्षणतज्ज्ञांची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांनी एकत्र येऊन एक टीम तयार करावी. त्यामुळे मूल्य, अर्थकारण आणि वातावरण जपण्यास मदत होईल.
शिक्षण समाज घडवितो. त्यामुळे त्यातून मूल्य जपणे आवश्यक आहे. आज देशात गरीबी आणि भुकमरी वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करीत, बेरोजगारीसारख्या समस्या सोडवा. मात्र, हे करताना कुठलाही शॉर्टकट वापरू नका असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. दोन दिवसीय परिसंवादात देशातील २०० विद्यापीठांचे कुलगुरू आणि आयआयटी आणि आयआयएम या संस्थांचे संचालक सहभागी झाले आहे. आभार सचिव राजेंद्र पाठक यांनी मानले.
Web Title: Nagpur Resurgence Foundation Vnit Seminar Nitin Gadkari Educators Think Future
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..