नागपूर : रेल्वे प्रवासाला निघताना सामानाची ने-आण हा सर्वात अडचणीचा टप्प ठरतो. पण, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूरकर प्रवाशांना या चिंतेतून मुक्ती देण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात खासगी कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ही कंपनी प्रवाशांच्या घरापासून रेल्वेपर्यंत सामान पोहोचवून देईल आणि परतल्यावर सामान परत दारापर्यंत सोडून देईल.
प्रवाशांची सुविधा आणि रेल्वेला उत्पन्न या द्विसुत्रीवर आधारीत नवनवीन उपक्रम मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून राबविले जात आहेत. त्यात आता ‘सामान भरो, निकलपडो’ या संकल्पनेवर आधारित सेवा उपराजधानीत सुरू केली जात आहे. गुरूग्रामच्या बुकबॅगेज डॉट कॉम प्रायव्हेट लिमिटेडकडून ही सेवा दिली जाणार आहे.
या सेवेसाठी कंपनीकडून निश्चित शुल्काची आकारणी केली जाणार आहे. दर अद्याप जाहीर करण्यात आले नसरे तरी ते किफायतशीर असतील असा दावा रेल्वेने केला आहे. प्रावाशांसाठी सुविधादायी ठरणाऱ्या या सेवेतून रेल्वेला वार्षिक ५.५० लाखाचे उत्पन्न मिळेल. चालू आर्थिक वर्षात नागपूर विभागाने केलेला हा दहावा आणि सर्वाधिक किमतीचा करार आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य यांच्या नेतृत्वात कंपनीसोबत करार करण्यात आला.
अत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे ही यंत्रणा नियंत्रित केली जाणार आहे. डीजिटल स्वरूपात लेबलिंग व बॅगचे ट्रॅकिंग केले जाईल. सोबतच मागणीनुसार बॅगचे पॅकिंगही करून दिले जाणार आहे. प्रवाशाने नोंदणी करताच सामानाच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी कंपनीची असेल. कंपनीचे प्रतिनीधी प्रवासाने दिलेल्या पत्त्यावर जाऊन सामान घेतील आणि रेल्वेस्टेशनवर पोहोचवून देतील. संबंधित ग्राहक परतल्यावर पुन्हा कंपनीचे प्रतिनिधी स्टेशनवर पोहोचून सामान घरापर्यंत पोहोचवून देतील. अशाप्रकारची ही देशातील पहिलीच सेवा आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.