मार्च महिन्यातच पारा वरचढ, कूलरही निघाले बाहेर; जलवाहिनी नसलेल्या भागात वाढतेय समस्या

people facing water scarcity issue even in march in nagpur
people facing water scarcity issue even in march in nagpur

नागपूर : गेल्या काही दिवसांत शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. अनेकांनी कूलरही बाहेर काढले. त्यामुळे आता शहरात पाणीटंचाईची समस्या तोंड वर करीत असल्याचे दिसून येत आहे. पूर्व नागपुरातील काही भागांत पाणीसमस्या वाढली आहे. नागरिकांची ओरड सुरू झाल्याने नगरसेवकाने जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये टँकर वाढविण्याची मागणी केली. अशीच स्थिती शहर सीमेवरील भागातही असून नागरिकांकडून पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

उन्हाळा लागताच शहरात कूलर बाहेर निघत असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होते. यंदा फेब्रुवारीपासूनच शहरात तापमान वाढले. आजही शहरात ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. होळीनंतर तापणारे शहर फेब्रुवारीपासूनच उष्ण होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही यंदा लवकरच वाढ होत आहे. शहराच्या काही भागांत पाण्यासाठी ओरडही सुरू झाली. अर्थातच, पाणीटंचाई सुरू झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवरून प्रभाग २६ मधील नगरसेवक अ‌ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा व ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. प्रभाग २६ मधील धरतीमाँ नगर, विश्वशांती नगर, पवनशक्ती नगर, साहिल नगर, अंतुजी नगर, अब्बुमीया नगर, न्यू सूरज नगर, तुलसी नगर आदी वस्त्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली. या वस्त्या शहर सीमेवरील आहेत. याशिवाय इतर शहर सीमेवरील वस्त्यांमध्येही जलवाहिनीचे जाळे नसल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही अ‌ॅड. मेश्राम यांनी केली. याशिवाय नव्याने टाकलेली जलवाहिनी अद्याप सुरू न झाल्याने तेथे जलवाहिनी सुरू करून नागरिकांना डिमांड पोहोचविण्याच्या सूचनाही अ‌ॅड. मेश्राम यांनी केल्या. प्रभाग २६ मधील वस्त्यांप्रमाणेच कळमना भागातील काही वस्त्यांमध्येही पाणीसमस्येने तोंड वर केले आहे. 

२२६ टॅंकर सुरू - 
सध्या शहरात २२६ टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरच्या माध्यमातून जलवाहिनीचे जाळे नसलेल्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येते. आता ऊन तापत असल्यामुळे जलवाहिनीचे जाळे नसलेल्या भागातही कूलर बाहेर निघाले आहेत. त्यामुळे या वस्त्यांमध्ये पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

पाणीसंकटात विहिरीतून पंप 
शहरावर पाणीसंकट ओढवल्यास शहरातील विहिरींनी महापालिकेने मदत घेतली आहे. सध्या शहरात २८९ विहिरींतून पंपाने पाणीपुरवठ्याची सुविधा आहे. याशिवाय ४०९ बोअरवेलची निर्मिती करण्यात आली. यातील काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे विहिरीवरील पाणीपंप तसेच नादुरुस्त बोअरवेल सुरू करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com