VIDEO : मराठी माणूस आहे देशातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती, २० पदव्या मिळविणारं हे व्यक्तीमत्व आहे तरी कोण?

shrikant jichkar is the most educated person in india
shrikant jichkar is the most educated person in india

नागपूर : जगात एकापेक्षा एक सुशिक्षित लोक आहेत. अशा लोकांबाबत तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. मात्र, भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती कोण होते आणि त्यांच्याकडे किती पदव्या होत्या? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? त्या व्यक्तीनं घेतलेल्या पदव्यांमुळे त्यांचे 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून नावही नोंदले गेले. आज ते जीवंत नाहीत. मात्र, आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही. हे इतके महान व्यक्तीमत्व आपल्या महाराष्ट्रातील ते देखील नागपूर जिल्ह्यातील आहेत आणि त्यांचे नाव आहे डॉ. श्रीकांत जीचकार.

डॉ. श्रीकांत जिचकार यांनी दिल्या तब्बल ४२ परीक्षा -

श्रीकांत जिचकार यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ ला नागपूर जिल्ह्यातील काटोलपासून ११ किलोमीटर अलिकडे असलेल्या आजनगावात एका सधन शेतकरी कुटुंबात  झाला. त्यांनी एमबीबीएस आणि एमडीची डिग्री नागपुरातून घेतली. त्यानंतर वकीलीची सनद मिळविली. तसेच व्यावसायिक विषयात त्यांनी मास्टर डिग्री मिळविली. त्यानंतर पत्रकारितेची देखील डिग्री मिळविली. त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये विद्यापीठातील सर्वात प्रतिष्ठेची असणारी डि. लिट. ही पदवी देखील प्राप्त केली. अशाप्रकारे त्यांनी १९७३ ते १९९० या काळात उन्हाळी आणि हिवाळी या सत्रामध्ये विद्यापीठाच्या तब्बल ४२ परीक्षा दिल्या. ते अनेक परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी बऱ्याच परीक्षांमध्ये सुवर्णपदक देखील मिळविले. त्यांनी हे सर्व शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले.   

श्रीकांत यांनी १९७८ मध्ये   केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे घेण्यात येणारी भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली. त्यामध्ये चांगली रँक मिळवून ते उत्तीर्ण देखील झाले. त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. मात्र, रुजू झाले नाहीत. त्यांनी परत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि १९८० मध्ये आयएएस म्हणून रुजू झाले. मात्र, निवडणूक लढवायची असल्यामुळे त्यांनी चार महिन्यामध्येच राजीनामा दिला.  

सर्वात तरुण आमदार -
श्रीकांत जिचकार महाविद्यालयीन जीवनातच राजकारणात सक्रीय होते. त्यांनी विद्यापीठात असताना राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये काटोल मतदारसंघातून काँग्रेसच्या जागेवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली. चांगल्या मतांनी विजयी होऊन वयाच्या २५ व्या वर्षी सर्वात तरुण आमदार होण्याचा मान देखील त्यांनी पटकाविला. त्याच काळात एकाचवेळी १४ विभागांचा कारभार पाहणारे ते विद्वान मंत्री ठरले.  त्यानंतर १९८६ ते ९२ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची वर्णी थेट दिल्लीमध्ये लागली.  त्यांनी १९९२ ते ९८ या काळात राज्यसभा खासदार देखील झाले. या काळात केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले.  

५२ हजार पुस्तकांची लायब्ररी -

श्रीकांत जिचकार यांचे शिक्षणाप्रती प्रेम हे त्यांनी मिळविलेल्या पदव्यांमधून दिसून येते. त्यांनी तब्बल ५२ हजार पुस्तकांची त्यांची वैयक्तीक लॉयब्ररी तयार केली होती. ते देशातील सर्वात मोठी वैयक्तीक लायब्ररी म्हणून ओळखली जाते. इतकेच नाहीतर त्यांना पेटींग, फोटोग्राफी आणि अँक्टींगची आवड होती. त्यांनी यूनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे. तसेच नागपुरात १९९२ मध्ये सांदीपानी शाळा देखील सुरू केली. 

डॉ. जिचकार यांनी मिळविलेल्या पदव्या - 
डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १० विषयांमध्ये एमए केले होते.  यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम या पदव्या देखील होत्या. इतकेच नाहीतर जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. ते आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस-उत्तीर्ण) होते आणि आय.ए.एस.(इंडियन अ‌ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस-उत्तीर्ण)ही होते.

कँसरवरही मात करणारे व्यक्तीमत्व -
श्रीकांत यांना सप्टेंबरमध्ये मलेरिया झाला होता. त्यानंतर ताप वाढल्यामुळे त्यांनी टुबरक्युलॉसीस देखील झाला. भारतात उपचार घेऊन देखील त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांना यूएसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कँसर असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो देखील शेवटच्या स्टेजवर होता. त्यावेळी डॉक्टरांनी फक्त १५ दिवसांची मुदत दिली होती. त्याचवेळी श्रीकांत यांनी कँसरसोबत लढायचे असे ठरविले. त्यांची इच्छाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोण यामुळे ते कँसरवर मात करून पूर्णपणे बरे झाले. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. श्रीकांत हे २ जून २००४ ला मित्रासोबत शेतातून घरी परतत असताना त्यांच्या कारला बसने धडक दिली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी २ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने जिचकारांच्या कार-ड्रायव्हरसह एसटी महामंडळालाही जबाबदार धरले आणि जिचकार यांच्या कुटुंबीयांना ५० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com